रविवार, २० ऑगस्ट, २०१७

बौद्ध संस्कृतीचे पुनरागमन

*बौद्ध संस्कृतीचे पुनरागमन*
    (Comeback of Buddhist Culture)
                                                                   *"Buddhism  disappeared from India largely of this wavering attitude of the laity. If hereafter Buddhism is to be firmly established in India the laity must exclusively be tied up to it. This did not happen in the past because in Buddhism there was a ceremony for initiation into the Dhamma."*
                        *-Dr. B. R. Ambedkar*
        डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ फेब्रुवारी, १९५५ रोजी कोलकाताच्या महाबोधी सोसायटीचे महासचिव *डी. वली सिन्हा* यांना पाठविलेल्या पत्रात उपरोक्त उद्गार काढले आहेत. या पत्रात त्यांनी भारतातून बौद्धधम्म लुप्त होण्यास उपासकांची डळमळीत भूमिका कारणीभूत आहे, असा उल्लेख केला. यानंतर बौद्धधम्म ख-या अर्थाने प्रतिष्ठापित करावयाचा असेल तर उपासकांनी पक्का निर्धार करायला पाहिजे. ही गोष्ट घडू शकली नाही कारण उपासकांसाठी दीक्षा देण्याची तरतूद धम्मात नव्हती.
       १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुक्कामी जी धम्मक्रांती केली त्याचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे भारतात धम्माच्या पुनरागमनासाठी उपासकांना बुद्धधम्माची दीक्षा दिली. धम्म हा केवळ भिक्खूसंघावर विसंबून न राहता तो उपासकांचाही व्हावा, अशी डॉ. आंबेडकरांनी नवीन संयोजना केली. ख्रिस्ती धर्मात बाप्तिस्मा व ऑर्डिनेशन हे अनुक्रमे ख्रिस्ती धर्मप्रवेश आणि ख्रिस्ती धर्मपुजारी यासंबंधीचे दोन विधी आहेत. तसे बुद्धधम्मातही असावेत. यासाठी बौद्धांनी ख्रिस्ती धर्माचे अनुकरण करावे, यासंबंधी डॉ. आंबेडकर म्हणतात -
       *'In this respect the new movement for the propagation of Buddhism n India must copy Christianity. To remove this dangerous evil in Buddhism I have prepared formula which I call Dhamma Diksha.'*
        डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी *'धम्मदीक्षा'* आपल्या अनुयायांना दिली, तो विधिवत कार्यक्रम नाविन्यपूर्ण होता. कारण भिक्खू हे उपासकांना श्रामणेर बनविण्यासाठी व श्रामणेरांना भिक्खू बनविण्यासाठी *'उपसंपदा'* करीत असतात. हा दीक्षाविधी फक्त भिक्खूंच्या हातून होत असतो. परंतु उपासकांनी उपासकांना बुद्धधम्माची दीक्षा देणे ही घटनाच अभूतपूर्व आहे. भारतातून बुद्धधम्म हा लुप्त होण्याच्या कारणामधील एक कारण असे आहे की, बुद्धधम्माची दीक्षा ही फक्त भिक्खूपुरतीच मर्यादित होती. भिक्खूच प्रचारक होते. भिक्खूच नष्ट झाले तर बुद्धधम्माला काही भवितव्य नव्हते. याचा सारासार विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही *'धम्मदीक्षा'* उपासकांपर्यंत आणली. हा त्यांचा निश्चितच क्रांतीकारक कार्यक्रम होता. आणि त्यासाठी *'बावीस प्रतिज्ञा'* दिल्या. बावीस प्रतिज्ञा देवून दीक्षा देणे, हा बौद्धांसाठी *'बाप्तिस्मा'*च होता. *या धर्मांतरित बौद्धांनी त्यांच्या डोक्यातील 'देव-देवतांचे' भूत झुगारून देणे आवश्यक होते. त्यासाठी २२ प्रतिज्ञांमधील सुरुवातीच्या  ५ प्रतिज्ञा यासंबंधीच आहेत. तेव्हा धर्मांतरित बौद्ध हा निरीश्वरवादी असावयास पाहिजे ही पूर्वअट आहे. त्याशिवाय त्याला बौद्धच होता येणार नाही. २२ प्रतिज्ञांचे अनुसरण करणारा हा ख-या अर्थाने बौद्ध होतो.
       या धर्मांतरित बौद्धांची प्रचारयंत्रणा ही ख्रिस्ती धर्माच्या धर्तीवर असावी, असे बाबासाहेब म्हणतात. धम्मप्रचाराचे संघटनात्मक कार्य करण्यासाठी *'The Buddhist Society of India'* या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेची जी १० उद्दिष्टे आहेत, तीच आजच्या प्रचारयंत्रणेचे स्वरूप असावे. ती उद्दिष्टे अशी आहेत -
  १.  भारतात बुद्ध-धम्माचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणे.
२.  बौद्धांचे पूजास्थान म्हणून विहारांची स्थापना करणे.
३.  धार्मिक आणि वैज्ञानिक विषयाच्या शिक्षणासाठी शाळा व महाविद्यालयाची स्थापना करणे.
४.  अनाथालये, इस्पितळे आणि मदत केंद्र स्थापन करणे.
५.  बुद्धधम्माच्या प्रचारार्थ कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण विद्यालय सुरू करणे.
६.  सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे.
७.  बौद्ध साहित्याचे प्रकाशन कार्य हाती घेणे आणि सामान्य जनतेला बौद्ध धम्माचा परिचय करून देण्यासाठी पत्रक आणि पुस्तिका काढणे.
८.  उपदेशकांचा नवा संघ निर्माण करणे, जर हे करणे शक्य असेल तर.
९.  प्रकाशनाचे कार्य करण्यासाठी प्रेस किंवा अनेक प्रेस निर्माण करणे.
१०.  भारतातील बौद्धांचे सामूहिक कार्य व त्यांच्यामध्ये मैत्रीभाव निर्माण करण्यासाठी सभा संमेलने व परिषदा भरविणे. (अनुवाद)
        भारतीय बौद्ध महासभेच्या उद्दिष्टांचा अभ्यास करून त्याअन्वये धम्माची प्रचारयंत्रणा उभारली तर निश्चितपणे भारतामध्ये बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन अधिक गतीने होऊ शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा