शनिवार, १२ जानेवारी, २०१९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अनुयायी

     मला अंध भक्त नकोत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारून हिंदू धर्मावर उपकार केले आहेत. पण त्याचबरोबर राष्ट्रहित जोपासून एक सच्चे राष्ट्रप्रेमी असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. केवळ राष्ट्रहित जोपासण्यासाठीच नव्हे, तर बुद्धधम्माच्या स्वीकारानेच अखंड मानव जातीचे कल्याण आहे. अशा या जगविख्यात विद्वानाचे आणि मानवाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. आयुष्यभर वंचित घटकांसाठी आणि देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणाऱ्या आणि आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर कुणीही पादाक्रांत करू शकणार नाही, अशा अतिउच्च ठिकाणी विराजमान झालेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला जत्रेचे स्वरूप न आणता आपल्या उद्गारकर्त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी त्यांनी दाखविलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांच्या विचारानुसार वागण्याचा प्रयत्न करायचा आहे तरच त्यांना आदरांजली वाहिल्यासारखे होईल. अन्यथा अनुयायी होणे सोपे आहे, परंतु अनुयायी म्हणून कर्तव्य पार पाडणे फार कठीण आहे.

     ३० मे १९३६ च्या आपल्या ऐतिहासिक भाषणात अनुयायांना उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, माणुसकी, समता व स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी धर्मांतर करणे योग्य आहे. परंतु हे समजावून सांगतानाच ते म्हणाले "धर्मांतराच्या घोषणेची सार्थकता पटल्याशिवाय कुणीही धर्मांतर करू नये" याचा निर्णय करणे कर्तव्य कर्म तुमचे आहे. मी देखील बुद्धाच्या शब्दांचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो की, तुम्हीच आपले आधार व्हा ! स्वतःच्या बुद्धीला शरण जा ! दुसरा कुणाचाही उपदेश ऐकू नका ! सत्याचा आधार घ्या ! सत्यास शरण जा ! हा बुद्धाचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की, तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही.

    १३ ऑक्टोबर १९३५ साली येवले येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. या सभेत आपला अंतस्थ: हेतू जाहीर करण्यासाठी ही संधी ऐतिहासिक होती. त्यांनी आपल्या मनातील हेतू कागदावर लिहून आणला होता. जो पुढील प्रमाणे होता, "अस्पृश्य मानलेले वर्ग व स्पृश्य मानलेले वर्ग यामध्ये समता व संघटना घडवून आणण्याचा हेतूने, तितके सामर्थ्य नसतानाही माणसांची व द्रव्यांची अपरिमित हानी सोसून मुंबई एलाख्यातील अस्पृश्य वर्गानी महाड येथील चवदार तळ्यावर व नाशिक येथे काळाराम मंदिराचा लढा गेली सहा वर्षे सतत चालविला होता. परंतु स्पृश्य हिंदूंचे किंचितही मतपरिवर्तन झाले नाही. म्हणून अस्पृश्य वर्गाच्या या परिषेदेमध्ये ठराव पास केला गेला की, हिंदूंची मनधरणी करण्याचा प्रयत्न करून काहीच निष्पन्न होत नसल्याने अस्पृश्य वर्गाने आपले सामर्थ्य मुळीच खर्च करू नये. स्पृश्य मानलेल्या वर्गापासून आपला समाज स्वतंत्र करावा व भारतातील अन्य समाजामध्ये आपल्या समाजाला मनाचे व समतेचे स्थान मिळवण्याकरिता प्रयत्न करावा असे सांगितले. याच सभेत त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो त्याला माझा नाईलाज होता पण हिंदू धर्मात कदापि मरणार नाही, अशी घोषणा केली. अर्थातच धर्मांतराच्या मार्गाने जाण्याच्या उद्देशाने त्यांचे ते भाषण होते.

     डॉ. बाबासाहेब धर्मांतर करणार ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना वाटत होते की, डॉ. बाबासाहेबांनी आमचाच धर्म स्वीकारला. १६ ऑक्टोबर १९३५ रोजी शीख धर्म स्वीकारावा अशा आशयाची तार सुवर्ण मंदिराचे उपाध्यक्ष सरदार दरीपसिंग ठोंबिया यांनी अमृतसरवरून पाठवली. टाईम्स ऑफ इंडियाने २६ ऑक्टोबर १९३५ च्या आपल्या अंकात डॉ. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेची सविस्तर बातमी छापली. ती वाचून प्रा. धर्मानंद कोसंबी २७ ऑक्टोबर १९३५ रोजी राजगृह या ठिकाणी डॉ. बाबासाहेबांना भेटले. यामध्ये मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मालाही वाटू लागले की, डॉ. बाबासाहेबांनी आमचा धर्म स्वीकारावा.

     डॉ. बाबासाहेबांनी जर मुसलमान अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तर हिंदू धर्मावर मोठे संकट ओढवेल या भीतीने डॉ. एम. बी. वेलकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंचे शिष्टमंडळ २५ ऑक्टोबर १९३५ रोजी राजगृह येथे डॉ. बाबासाहेबांना भेटले. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी वेलकर यांना धीर देत सांगितले की, भारत देशाच्या हिताला धोका होईल, अशा प्रकारचे धर्मांतर मी करणार नाही. वाराणसी येथील महाबोधी सोसायटीने देखील डॉ. बाबासाहेबांना हिंदू धर्म सोडण्याचे ठरले असेल तर बुद्धधम्म स्वीकारावा या आशयाची तार पाठवली.

     धर्मांतराच्या बाबतीत आपली व अस्पृश्य समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व धर्माचा अभ्यास करू लागले. धर्मांतराच्या सात महिन्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये ( ३० मे १९३६ ते ०२ जून १९३६ ) एक सभा घेतली. आणि या सभेमध्ये धर्मांतराची कारणे व हिंदू धर्माच्या अस्पृश्यांबाबत वागणुकीची काही उदा. सह पटवून दिली. आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी मुसलमान व ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. डॉ. बाबासाहेबांचे सगळे भाषण हे अस्पृश्यांच्या उद्धार व त्यांच्या मुक्तीसाठी होते.

     मुसलमान व ख्रिस्ती धर्माचे लोक जगभर पसरलेले होते. त्यांच्याकडे असणारी साधने नक्कीच डॉ. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या निर्णयाला पोषक होती. त्यांच्यापैकी धर्माचा स्वीकार केला असता तर अस्पृश्य समाजाची अस्पृश्यता नष्ट होणार होती. शिवाय त्यांना प्रचंड पाठबळ या धर्मांच्या देशांकडून मिळाले असते. पण डॉ. बाबासाहेबांनी देशाला घातक ठरेल असा कुठलाच धर्म स्वीकारण्याचा विचार केला नव्हता. त्यांचा कल काहीसा शीख धर्म स्वीकारण्याकडे होता. मात्र हे लक्षात आल्याने डॉ. बाबासाहेबांनी चुकुनही मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारू नये म्हणून हिंदू महासभेचे नेते डॉ. मुंजे, ब. जयकर, रामानंद चटर्जी, बिर्ला आणि स्वतः शंकराचार्य ( डॉ. कुर्तकोटी ) यांनी बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारावा म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊ लागले.

     डॉ. कुर्तकोटी यांनी २१ ते २३ ऑक्टोबर १९३६ च्या लाहोरच्या अधिवेशनात सांगितले की, अस्पृश्याना मानवी हक्कापासून दूर ठेवणे ही आपली चूक झाली, ती चूक मान्य करून अस्पृश्यांची क्षमा मागून त्यांना जवळ घेतली पाहिजे. शिवाय आपल्या भाषणात ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उलट आपल्या प्रचंड प्रयत्नांनी आणि कार्यांनी अस्पृश्य समाजाला जागे केले आणि त्यांच्यात त्यांच्यात स्वाभिमान जागवून आम्हा हिंदूंना नतमस्तक केले आहे. त्यांचे आम्हावर अगणित उपकार आहेत. पुढे शीख धर्माशी डॉ. बाबासाहेबांचे काही मतभेद झाल्यामुळे त्यांनी विचार केला की, कोणताही धर्म स्वीकारला तरी अस्पृश्यांचे राजकीय हक्क सुरक्षित राहतील. त्यामुळे त्यांनी शीख धर्म स्वीकारण्याचा विचार सोडून दिला आणि पुन्हा बुद्धधम्माचा विचार व अभ्यास करण्यास प्रवृत्त झाले. डॉ. बाबासाहेबांच्या हृदयात खोलवर बुद्ध धम्माबद्दलचा नितांत आदर रुजला होता त्यामुळे त्यांनी आपल्या वृत्तपत्राच्या छापखाण्याचे नामांतर बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असे केले होते.





आर. डी. सांगळे
मो. ९८५०६२११५८
पान नं. ९, दैनिक सम्राट, बुधवार ६ डिसेंम्बर २०१७.

    

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा