भीमा कोरेगाव - 2018 दंगल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भीमा कोरेगाव - 2018 दंगल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १६ जुलै, २०१८

शहरी माओवादाची भीती किती खरी किती खोटी ?

प्रा. नंदिनी सुंदर

समाजशास्त्र प्राध्यापक


11 जुलै 2018

प्रतिमा मथळा - दलित हक्क कार्यकर्ते आणि लेखक सुधीर ढवळे

भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार झाल्यानंतर, माओवाद्यांच्या सहकार्यानं हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी पाच कार्यकर्त्यांना अटक झाली. या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला होता असं देखील पोलिसांनी म्हटलं होतं. 'शहरी माओवाद' पसरत असल्याबाबत पोलिसांनी चिंता व्यक्त केली होती. शहरी माओवादाची भीती किती खरी किती खोटी याचा वेध प्रा. नलिनी सुंदर यांनी घेतलाआहे.


नाझी सरकारच्या 'पीपल्स कोर्टा'नं 1934 ते 1945 या काळात 'राष्ट्रद्रोह्यां'विरोधात चालवलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन बर्लिनमध्ये सुरू आहे.

भारतीय दृष्टिकोनातून पाहिलं तर या प्रदर्शनात आपल्याला काही साम्य दिसू शकतं. भारतीय न्यायव्यवस्था आणि नाझी सरकारच्या पीपल्स कोर्टमध्ये साम्य होतं असा त्याचा अर्थ नाही. सुदैवानं आपली न्यायव्यवस्था तशी नाही. पण ज्या प्रकारचे आरोप नाझी सरकारनं ठेवले त्याच प्रकारचे आरोप काही प्रमाणात भारतात पाहायला मिळत आहेत.

आपल्या भागातल्या पोलिसांना पत्रकं वाटणारा, खाणकाम करणारा साम्यवादी मजूर, देशातल्या प्रमुख नाझी नेत्यांवर जोक मारणारा बॅंक कर्मचारी, हिटलरवर उपहासात्मक कविता करणारा ध्वनितंत्रज्ञ आणि हिटलरच्या नावाचा उल्लेख पत्रांमध्ये करणारा रिअल इस्टेट एजंट यांची छायाचित्रं आपल्याला इथं पाहायला मिळतात.

या सर्वांना पीपल्स कोर्टानं मृत्युदंड ठोठावला होता.

प्रतिमा मथळा - हिटलर

या सर्वांचा गुन्हा काय होता? तर त्यांनी म्हणे अत्युच्च पातळीचा विश्वासघात केला होता. एका प्रकरणात असं आढळलं की एका पोस्ट ऑफिसनं पत्र पत्त्यावर पाठवण्यात दिरंगाई केली होती.

त्या पोस्ट ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांवर अप्रमाणिकतेचा ठपका ठेवण्यात आला होता. युद्धाच्या काळात जे अधिकारी काम करत आहेत त्यांच्याशी ते अप्रमाणिकपणे वागले हा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसंच त्यांनी शत्रू राष्ट्राला सहकार्य केलं असा आरोप देखील ठेवण्यात आला होता.

एका प्रकरणात 22 वर्षीय स्वीस मिशनरीवर हिटलरला मारण्याचं कारस्थान करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हा मिशनरी विनातिकिट प्रवास करताना पकडला गेला. मग त्याची चौकशी करण्यात आली आणि नाझी पोलिसांनी त्याच्यावर हिटलरच्या हत्येचं कारस्थान केल्याचा आरोप ठेवला.

पोलिसांनी असं म्हटलं की चौकशीदरम्यान त्यानं हिटलरला मारण्याच्या कारस्थानाची कबुली दिली. 'हिटलर हा ख्रिश्चनविरोधी आणि मानवताविरोधी आहे म्हणून त्याला मारण्याची आपण योजना आखली,' अशी कबुली त्यानं दिल्याची नोंद पोलिसांनी केली होती.

"जर्मनीचे तारणहार, ज्यांच्यासाठी जर्मनीतल्या 8 कोटी जनतेचं हृदय प्रेमानं धडकतं, ज्यांच्याविषयी जर्मनीच्या मनात नितांत आदर आणि कृतज्ञता आहे, ज्याचं नेतृत्व खंबीर आहे अशा व्यक्तीला (हिटलर) मारण्याचा कट रचल्याची कबुली आरोपीनं दिली आहे," असं पोलिसांनी लिहिलं होतं.

याआधी एक वेगळं प्रदर्शन जर्मनीत आयोजित करण्यात आलं होतं. नाझी सरकारच्या काळात माध्यमांचं काय योगदान होतं त्यावर हे प्रदर्शन आधारित होतं.

त्या काळात सरकारविरोधी माध्यमांना चिरडलं गेलं आणि बहुतेक माध्यमांनी सरकारसमोर गुडघे टेकले होते. युद्धानंतर काही नाझी समर्थक पत्रकारांनी आपली ओळख बदलून आपलं बस्तान पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते.

देशात शहरी माओवाद्यांचं एक विस्तीर्ण जाळं पसरत असल्याची भीती काही माध्यमं व्यक्त करत आहेत. पोलीस आणि काही वृत्तवाहिन्यांच्या मदतीनं एक नव्या आवृत्तीचा फॅसिजम आकार घेऊ लागला असल्याचं दिसत आहे.

'देशाचे तारणहार' पंतप्रधान मोदी यांना मारण्याचा कट रचला आहे, अशी 'स्फोटक' पत्रं गूढरीतीनं 'टाइम्स नाऊ'च्या हाती येतात. मग अॅड. सुधा भारद्वाज यांनी कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेली बनावट पत्रं 'द रिपब्लिक'वर दाखवली जातात.

या पत्रांच्या भाषेवरून त्यांच्या अस्सलतेवर शंका येते. ती अशक्यप्राय वाटतात - जसं की थेट नावांचा उल्लेख पत्रात असणं, निधी पुरवठ्याबाबत उघड बोलणं, काश्मिरी फुटीरतावाद्यांशी संबंधांची कबुली देणं, दगडफेक, मानवी हक्क वकील, JNU, TISS विद्यार्थी, UAPA विरोधातली आंदोलन, काँग्रेस पक्ष आणि आणखी अशा बऱ्याच गोष्टींचे उल्लेख या पत्रांमध्ये आहेत.

या गोष्टी भाजपला आवडत नाहीत हे उघड आहे. पण त्यानं काही फरक पडत नाही. त्यांचा खरा उद्देश लोकशाहीवादी लोकांना बदनाम करणं, त्यांना भीती घालणं, ध्रुवीकरण करणं आणि मानवी हक्क संरक्षण या संकल्पनेलाच बदनाम करणं आहे.

आतापर्यंत कार्यकर्ते, संशोधक, पत्रकारांना अशा केसेसमध्ये गोवलं जात होतं. आता त्यांची बाजू लढवणाऱ्या वकिलांनादेखील लक्ष्य केलं जातं. की सुरेंद्र गडलिंग यांच्यासारख्या वकिलांवर आरोप ठेवले जात आहेत हा काही निव्वळ योगायोग नाही. गडलिंग हे आदिवासी, दलित आणि राजकीय कैद्यांची बाजू न्यायालयात मांडतात.

एस. वांछिनाथन हे तुतीकोरीनमध्ये स्टरलाईट पीडितांच्या बाजूनं लढत होते. त्यांच्यावर आणि हैदराबादचे मानवी हक्क वकील चिक्कुडू प्रभाकर यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. प्रभाकर हे यापूर्वी एका किरकोळ आरोपात छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातल्या एका तुरुंगात 6 महिने काढून आले होते.

द रिपब्लिक टीव्हीवर मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा यांची हेटाळणी 'कॉम्रेड सुधा' अशी करण्यात आली. सुधा या कामगार नेत्या, मानवी हक्क संरक्षण वकील, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी (PUCL) च्या सचिव आणि दिल्लीच्या राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या अतिथी प्राध्यापक आहेत.

बार काउन्सिलनं वकिलांचं व्यावसायिक वर्तन कसं असावं याची यादी तयार केली आहे. त्यात असं म्हटलं आहे की वकिलांनी निरपेक्षपणे आपल्या अशिलाचा बचाव करावा.

वकिलानं हे नेहमी ध्यानात ठेवावं की, त्याची बांधिलकी ही कायद्याशी आहे आणि कायदा असं सांगतो की कुठलीही व्यक्ती सबळ पुरावा असल्याशिवाय शिक्षेस पात्र ठरत नाही.

जे वकील ही मानकं गंभीरपणे घेतात त्यांना पोलीस लक्ष्य करत आहेत. ते असं सूचित करत आहेत की जे वकील अशा आरोपींची बाजू मांडत आहेत त्यांना पोलीस व्यावसायिकाप्रमाणे न वागवता आरोपींप्रमाणे वागवत आहेत.

इतर वकिलांनी संवेदनशील आणि वादग्रस्त केसेस स्वीकारू नये असा पोलिसांचा उद्देश आहे. त्यांच्या मनात भीती बसावी यासाठी ते असं करत आहेत.

सध्याच्या स्थितीवरून असं दिसत आहे की जे लोक सत्ताधारी पक्षाशी बांधिलकी ठेवतील त्यांना कुणीही हात लावणार नाही. त्यांच्यावर बलात्काराचा, जातीय दंगलीचा किंवा जमावासोबत सामील होऊन कुणाला ठार करण्याचा आरोप असला तरी त्यांना कुणी काही करणार नाही.

जसं की, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्ट परिसरात विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारला मारहाण करणाऱ्या वकिलांवर कुठलीही कारवाई झाली नाही. वकिलांनी जागं झालं पाहिजे आणि त्यांच्यासारख्याच इतर व्यावसायिकांच्या हक्कांच्या संरक्षणार्थ उभं राहिलं पाहिजे. अन्यथा खूप उशीर होईल.

महाराष्ट्रात 6 जूनला पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अॅड. सुरेंद्र गडलिंग, इंग्रजीच्या प्राध्यापक शोमा सेन, लेखक सुधीर ढवळे, वन हक्क कार्यकर्ते महेश राऊत आणि तुरुंगवासी हक्क संरक्षण कार्यकर्त्या रोना विल्सन यांची अटक देखील हेच सूचित करते.

त्यांच्यावर आधी भीमा कोरेगाव दंगल घडवून आणण्याचा आरोप ठेवण्यात आला आणि लगेच त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजीव गांधी स्टाइलनं हत्या करण्याच्या कारस्थानाचा आरोप ठेवण्यात आला.

त्यांना हेच सूचित करायचं आहे की कायद्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असणाऱ्या पुराव्यांना आणि पद्धतींना त्यांच्या लेखी किंमत शून्य आहे.

हे फक्त हिंसा रोखण्याच्या दृष्टीनं आहे असं समजण्याची चूक करू नका. तसं असतं तर भीमा कोरेगाव हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर पुढील कारवाई झाली असती.

पण हे हिंसाचाराबाबत नाही. यातून फक्त हेच दाखवून द्यायचं आहे की 'जनतेचे पोलीस' हे त्यांच्या मालकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि त्यांना सत्तेत ठेवण्यासाठी ते सर्वकाही करतील.

(नंदिनी सुंदर या दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्र शिकवतात. या लेखात व्यक्त केलेली मतं ही त्यांचीवैयक्तिक मतं आहेत.)


संदर्भ : https://www.bbc.com/marathi/india-44770632

मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

भीमा कोरेगावातली हिंसा नेमकी कशामुळे भडकली?

ग्राउंड रिपोर्ट : भीमा कोरेगावातली हिंसा नेमकी कशामुळे भडकली?


मयुरेश कोण्णूरबीबीसी मराठी प्रतिनिधी


5 जानेवारी 2018

भीमा कोरेगावात 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराचं मूळ वढू या गावात असण्याची शक्यता आहे. संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कोणी केले यावरून दोन समाजगटांत अनेक वर्षांपासून वाद आहेत.


'भारिप' बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केले आणि गेल्या आठवड्यात कोरेगांव परिसरात घडलेल्या घटनांच्या चौकशीची मागणी केली आहे.

चौकशीची मागणी

दलित समाजातील गोविंद गायकवाड यांचं स्मरण म्हणून भीमा कोरेगावपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वढू येथे उभारण्यात आलेली शेड आणि माहिती फलक यावरून गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गटांमध्ये वाद सुरू होता.


"संभाजी महाराजांच्या समाधीचा हा वाद आहे. गोविंद गायकवाड नावाच्या व्यक्तीवरून हा वाद आहे. संभाजी महाराजांचं... सगळं तुकडे तुकडे झालेलं शरीर शिवून अंत्यविधी केला, त्या गोविंद गायकवाडांच्या संदर्भात त्या ठिकाणी वाद चाललेला आहे."

"ती जागा उद्ध्वस्त करण्यात आली. त्यामध्ये मिलिंद एकबोटे होते आणि त्यांच्याचबरोबर संभाजी भिडे होते. त्या प्रकरणात पोलिसांनी केसेस केलेल्या आहेत. एकंदरीत ४९ आरोपी आहेत, ९ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना १ जानेवारीच्या आठवडाभर आधी घडलेली आहे. त्याचा परिणाम इथं झाला का हा शोध घेणं त्याच्यातला भाग आहे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काही स्थानिक गावकऱ्यांनी या ऐतिहासिक संदर्भांना आक्षेप घेतला होता.

"समाधीवरून काहीच वाद नव्हता. पण २८ तारखेला जो एका रात्रीत फलक तिकडे लागला त्यावरून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी होती. मग तो बोर्ड काढला गेला. गावात शांतता नांदावी म्हणून पोलिसांनी सगळ्यांची बैठक घेतली आणि गावात शांतता ठेवावी असं ठरलं. वाद फक्त फलकावरून होता आणि गैरसमजातून पुढच्या गोष्टी घडल्या", असं वढूचे ग्रामपंचायत सदस्य असलेले रमाकांत शिवले म्हणाले.


"गायकवाड आणि गावकऱ्यांचे संबंध चांगले आहेत, आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो. पण बाहेरच्या संघटना आल्या, काही वेगळं सांगितलं गेले आणि मग त्या केसेस दाखल झाल्या," असं रमाकांत शिवले म्हणाले.

दुसरी बाजू

या ऐतिहासिक तपशीलांच्या दुसऱ्या बाजूनंही प्रतिक्रिया आहे.

"जो इतिहास संभाजी महाराजांसोबत गोविंद गोपाळांचा होता तो पहिल्यापासून आहे. त्यात नव्यानं काही सांगितलेलं नाही. गोविंद गोपाळांची समाधी तिथं पहिल्यापासूनच आहे. इतिहासातही हा उल्लेख आहे. त्यामुळे नव्यानं काही सांगण्यात आलं हे चुकीचं आहे," पुणे महानगरपालिकेतील RPI आठवले गटाचे नेते डॉ सिद्धार्थ धेंडे म्हणाले.

"हे जे कोणी करत आहे त्यांना या समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करायची आहे," असं डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले.

पोलिसांनीही भीमा कोरेगाव युद्धाच्या द्विशतकपूर्ती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या वादावर तोडगा काढायचा प्रयत्न केला होता. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी याविषयी 'बीबीसी मराठी'शी बोलताना सांगितलं, "दोन तीन दिवसांपूर्वी वढूमध्ये एका समाधीवरून वाद झाला होता. पण पोलिसांनी योग्य वेळेस हस्तक्षेप केला, कारवाई केली."


"नंतर आम्ही गावातल्या दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्र आणून वाद मिटवला होता. काही समाजकंटकांनी जर जाणूनबुजून या मुद्द्यावरून चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस नक्की कारवाई करतील," असं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी याविषयी 'बीबीसी मराठी'शी बोलताना सांगितलं.

तरीही, स्थानिकांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी भीमा कोरेगाव परिसरात काही गटांकडून घोषणाबाजी सुरू झाली. पोलिसांनी तत्परतेनं कारवाई केली. परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली आणि दगडफेक सुरू झाली. अनेक गाड्यांचं नुकसान झालं, काही जण जखमी झाले आणि एका तरूणाचा मृत्यू झाला.


न्यायालयीन चौकशीचे आदेश

या घटनेमागे परिसरात अगोदर घडलेल्या वादांचं कारण आहे का याची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी 'ट्विटर'वर या घटनेवर प्रतिक्रिया देतांना म्हणाले, "भीमा-कोरेगांवच्या लढाईला २०० वर्षं झाल्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील ही कल्पना होतीच. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन तीन चार दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे वढू येथील ग्रामस्थ सांगत आहेत."

मंगळवारी संध्याकाळी पुण्यातील पिंपरी पोलिस स्टेशनध्ये अनिता साळवे यांच्या फिर्यादीनंतर 'शिवप्रतिष्ठान'चे संभाजी भिडे आणि 'समस्त हिंदू आघाडी'चे मिलिंद एकबोटे यांच्यावर अॅट्रोसिटी आणि दंगल घडवणे या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

"कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. हा प्रकार गैरसमजातून घडलेला आहे. झालेला त्रास, झालेल्या मालमत्तेचे नुकसान आणि दंगलीचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारे समाजात दुही निर्माण करण्यामागे आणि अफवा पसरवण्यामागे ज्यांचा हात आहे, त्यांच्याबाबत तपास करून पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशी समस्त हिंदू आघाडीची मागणी आहे," असं मिलिंद एकबोटे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.