मराठवाडा विद्यापीठ नामांतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठवाडा विद्यापीठ नामांतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

नामविस्तार आंदोलन : जाणून घ्या, 'नामांतर ते नामविस्तार' घटनाक्रम...

१९७७ पासून सुरू झालेला नामांतराचा लढा पुढे १६ वर्षे सातत्याने लढला गेला. नामांतराची मागणी असलेल्या या लढ्याची अखेर १४ जानेवारी १९९४ ला नामिविस्ताराने झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow  | Published: January 14, 2019 01:33 PM | Updated: January 14, 2019 01:34 PM

Namantar Andolan : जाणून घ्या, 'नामांतर ते नामविस्तार' घटनाक्रम...

विद्यापीठ नामांतर आंदोलनाची वाढणारी व्याप्ती व तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारने २७ जुलै १९७८ रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने नामांतराचा प्रस्ताव एकमताने समंत करून मराठवाडाविद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठ असे नाव देण्याचा एकमुखी निर्णय घेतला. या निर्णयाचे हिंसक पडसाद तात्काळ मराठवाड्यात उमटले. यानंतर १९७७ पासून सुरू झालेला नामांतराचा लढा पुढे १६ वर्षे सातत्याने लढला गेला. नामांतराची मागणी असलेल्या या लढ्याची अखेर १४ जानेवारी १९९४ ला नामिविस्ताराने झाली.

१) २६ जून १९७४- नामांतराची पहिली मागणी केली गेली. मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र वाहूळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठवाड्यातील विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली. 

२)१६ जुलै १९७४- मुख्यमंत्री सचिवालयाने मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाला पत्र लिहून मागणीचे नोंद घेतली. 

३) ७ जुलै १९७७- मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी जाहिर मागणी प्रथम दलित पँथरचे सरचिटणीस  गंगाधर गाडे यांनी केली. 

४)१७ जुलै १९७७ - औरंगाबादच्या सरस्वती भुवनच्या प्रांगणात सर्वपक्षीय विद्यार्थी -युवक संघटनांनी एकत्र येऊन विद्यार्थी कृति समितीची स्थापणा केली.  या समितीत युवक क्रांती दल, युवक काँग्रेस, अ.भा.वि.प.जनता युवक आघाडी, समाजवादी क्रांती दल, एस.एफ.आय., दलित युवक आघाडी, युवा रिपब्लिकन , दलित पँथर, पुरोगामी युवक संघटनेचा समावेश होता. या बैठकीत इतर मागण्यासह मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली. 

५) १७ जुलै १९७७-  नामांतरासाठी पहिले जाहिर आंदोलन विद्यार्थी कृति समितीने पुकारले ते गुलमंडीवर एका दिवसाची धरणे देऊन. त्यात गणेश कोठेकर, अनिल महाजन, प्रवीण वाघ, विजय गव्हाणे, ज्ञानोबा मुंडे, पंडित मुंडे आदींचा प्रमुख सहभाग होता. 

५) १८ जुलै १९७७- विद्यार्थी कृति समितीने कॉलेज बंदचे आवाहन केले त्याला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. त्यासह समितीने एक मोठा मोर्चा विद्यापीठावर काढला. त्याच दिवशी विद्यापीठ कार्यकारणीची बैठक होती. या मोर्चात सर्व जातीय व सर्व पक्षीय नेत्यांचा समावेश होता. राम गायकवाड, गणेश कोठेकर, प्रविण वाघ, नामदेव रबडे, श्रीरंग वारे, भीमराव लोखंडे, प्रदीप देशपांडे, ज्ञानोबा मुंडे, तुकाराम पांचाळ, नागरगोजे,सुभाष लोमटे, जैन, एकबाल, अनिल महाजन, संग्राम मुंडे, राम दुतोंडे, कीर्ती डेलिवाल हे प्रमुख होते. 
-विद्यार्थी कृति समिती व दलित पँथरमध्ये येथे मतभेद होऊन दोन स्वतंत्र निवेदने विद्यापीठाला देण्यात आली. 

-विद्यापीठ कार्यकारणीने विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा एकमुखी ठरावही याच बैठकीत पारित केला. तेव्हा कुलगुरू भोसले , वसंतराव काळे, आ. किसनराव देशमुख,प्राचार्य राजाराम राठोड यांचा कार्यकारणीत समावेश होता. 

६) १८ जुलै १९७७- प्राचार्य संदानशिव यांच्या नेतृत्वाखालील मागासवर्गीय प्राध्यापकांचा मोर्चाही विद्यापीठावर धडकला. 

७)१८ जुलै १९७७- विद्यापीठास मौलाना आझाद यांचे नाव द्या, अशी मागणी करणारे निवेदन अहमद रझा रझवी, सिराज देशमुख, एस.एन. काद्री, मिर्झा शाहिन बेग यांनी विद्यापीठा दिले होते. 

८) १९ जुलै १९७७- विद्यार्थी कृति समितीतर्फे परभणीत मोर्चा काढण्यात आला. रामराव जाधव व माधव हातागळे यांनी नेतृत्व केले. बीड, जालना येथेही मोर्चे निघाले.

९) याच दरम्यान काही वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कार्यकारणीस निवेदने देऊन विद्यापीठास स्वामी रामानंद तीर्थांचे नाव देण्याची मागणी केली. 

१०) २१ जुलै १९७७- नामांतराल्ल विरोध करणारा पहिला मोर्चा निघाला. इंजिनिअरिंग, सरस्वती भुवन, देवगिरी, विवेकानंदच्या विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला. या मोर्चामुळे नामांतर चळवळीला जातीय रंग मिळाला. 
- याच दिवशी सायंकाळी विद्यार्थी कृति समितीने महाराष्ट्र शासनाची प्रेतयात्रा काढली. 

११) २२ जुलै १९७७- दलित पँथरचे नेते प्रीतमकुमार शेगावकर आणि गंगाघर गाडे यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याण कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. 

१२) २३ , व २४ जुलै १९७७- जनता मुस्लिम फोरमची औरंगाबादेत बैठक होऊन नामांतरास जाहिर पाठिंबा. या बैठकीला एसेम जोशी यांनी मार्गदर्शन केले. अकबर पटेल, उत्तमराव पाटील, निहाल अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. 

१३) २४ जुलै १९७७- उस्मानाबादेत नामांतर विरोधी विद्यार्थ्यांनी आंदोलन कले. 

१४) २४ जुलै १९७७- दलित पँथरची औरंगाबादेत बैठक व नामांतर लढा तिव्र करण्याचा निर्णय.

१५)२६ जुलै १९७७ - दलित पँथरचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा.

१६) ३० जुलै १९७७- मिलिंद महाविद्यालय परिसरातून शहरात मोर्चा. 

१७)२ आॅगस्ट १९७७-  दलित पँथरने मराठवाडाभर आंदोलनाचा निर्णय घेतला व नामांतर आंदोलनाची तिव्र लढाई सुरू झाली. आॅगस्ट मध्येच नामांतर विरोधी महाविद्यालयीन कृति समितीनेही आंदोलने सुरू केली व मराठवाडा जातीय द्वेषाने भडकू लागला. 

१८) २० ऑगस्ट १९७७- मुख्यमंत्री वसंतदादा पाटील शहरात , प्रीतमकुमार शेगावकर यांनी सुभेदारीवर मोर्चा काढला. शेगावकर, बाबुराव कदम, दौलत खरात यांना  मुख्यमंत्र्यांचे २६ आॅगस्ट रोजी मुंबईत चर्चेचे निमंत्रण.

१९) ८ सप्टेंबर १९७७- मुंबईत मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत मराठवाड्याीतल सामाजिक कार्यकर्ते व दलित नेत्यांची बैठकीत. नामांतरावर एकमत. या बैठकीला गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगावकर, बजरंगलाल शर्मा, गोविंदभाई श्रॉफ आदींची प्रमुख उपस्थिती .

२०) ११ सप्टेंबर १९७७: सरस्वती भुवन महाविद्यालयात नामांतर विरोधी महाविद्यालय विद्यार्थी कृति समितीची बैठक व १२ सप्टेंबर पासून बहिष्काराचे आंदोलनाचा इशारा. या कृति समितीचे संघटक मोहन देशमुख होते. त्यात अशोक फटांगडे, शिवाजी ढगे,सुरेश अवचार, प्रदीप जोगाईकर, विद्याधर पांडे, एकनाथ पाथ्रीकर हे होते. यांचे नेतृत्व अशोक देशमुख (परळी ) व राजा साळुंके (उस्मानाबाद ) यांनी केले. 

२१) १७ सप्टेंबर १९७७- मागासवर्गीय सुधार महासंघानेही बैठक घेऊन नामांतरास पाठिंबा दिला. 

२२) १९ सप्टेंबर १९७७- नामांतर विरोधकांचा मराठवाडा बंद, आंदोलने.

२३) २३ सप्टेंबर १९७७- मराठवाड्यातील जातीय तणाव निवळावा म्हणून काम करण्यासाठी प्राचार्य म.भि. चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली नागरिक- विद्यार्थी कृति समितीची स्थापना. या समितीत प्रा. बापूराव जगताप, ज्येष्ठ पत्रकार, संपादक बाबा दळवी हे कार्याध्यक्ष  व सुभाष लोमटे हे संघटक होते.  तकी हसन, कवि फ.मुं. शिंदे, डी.एल. हिवराळे, प्रकाश वांगीकर, डॉ. शशी अहंकारी, प्रवीण वाघ यांचाही समावेश  होता. 

२४) २३ सप्टेंबर १९७७- दलित युवक आघाडीने मूक मोर्चा काढला. 
--याच पद्धतीनेपुढे मोर्चा व प्रतिमोर्चा असे मराठवाडाभर जिल्हे, तालुके, एवढेच नव्हे तर गावपातळीवरही आंदोलन व प्रतिआंदोलनाचे सत्र सुरू झाले आणि मराठवाड्यात दलित -सवर्ण संघर्षाच्या ठिणग्या झडू लागल्या. 

२५) २७ जुलै १९७८- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ’ असा नामांतराचा ठराव मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित झाला.

२६) ऑगस्ट १९७८- नामांतराचा ठराव पारित झाल्यानंतर मराठवाड्यात तब्बल ११ दिवस जातीय दंगल उसळली. त्यात दलितांना जीवंत जाळण्यासह घरेदारे पेटवून देण्यात आली. दलित महिलांवर अत्याचार झाले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी करण्यात आली. याचे पडसाद मराठवाड्याबाहेर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी  कमी जास्त स्वरूपात उमटले. 

२७) १९७८ ते १९९४ पर्यंत तब्बल १६ वर्ष महाराष्ट्रात ठिकठिकाणी नामांतरासाठी आंदोलने होत राहिली. मराठवाडा ही आंदोलनाची केंद्रभूमि होता. 

२८) १४जानेवारी १९९४ - मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामविस्तार ठराव पारित करून कठोरपणे अमंलबजावणी केली. 



संदर्भ : http://m.lokmat.com/aurangabad/namantar-andolan-know-namantar-namavistara-day-day-happenings/

नामांतर आंदोलन : लाँगमार्च ! चल रं राजा, करूया फौजा, निशाण घेऊन निळं...

वाटेल तो त्याग सहन करण्याची तयारी, एक अद्भुत उत्साह, अनोखी ऊर्जा, स्वयशिस्तीचा अभिनव परिचय भीमसैनिकांनी या परिक्रमेत घडविला. या घटनेच्या आधी आंबेडकरी जनतेचे सांडलेले रक्त, घरादारांची झालेली राखरांगोळी, आयाबहिणींची जातीयवाद्यांनी लुटलेली अब्रू, आंबेडकरी रक्ताचे संघर्षतेज यापूर्वी पाहिलेच नव्हते, असे नाही. पण लॉंगमार्चमधून निर्माण झालेल्या स्वाभिमानाचे तेज यावेळी काही औरच होते.

By सुमेध उघडे | Follow  | Published: January 14, 2019 12:24 PM | Updated: January 14, 2019 12:30 PM

Namantar Andolan : लाँगमार्च ! चल रं राजा, करूया फौजा, निशाण घेऊन निळं...

औरंगाबाद : '' सहा डिसेंबर १९७९ ला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी शासन करीत नसेल तर आम्ही आपल्या हाताने विद्यापीठाच्या नामांतराचा फलक विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर फडकावून बाबासाहेबांना अभिवादन करू " ह्या एकाच ध्यासाने प्रा. जोगेन्द्र कवाडे या तरुण नवख्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा आंबेडकरी समुदायाचा लाँगमार्च गतिमान झाला. परिणामांची पर्वा न करता यात बाया-बापड्या, किशोर-तरुण-वृद्ध भीमसैनिक म्हणून त्यात सहभागी झाले. 

औरंगाबादमधील विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव १९७८ ला दोन्ही विधिमंडळात संमत झाला आणि इकडे मराठवाडा पेटला. आंबेडकरी समुदायांच्या वस्त्यांवर जीवघेणे झाले. हे हल्ले थांबायला तयार नव्हते, यात अनेक भीमसैनिकांचे मुडदे पडले, आया-बहिणींच्या इज्जतीवर घाला झाला, घरादारांची राखरांगोळी झाली. हे सारे चित्र प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शहीद पोचीराम कांबळे आणि जनार्दन मवाडे यांच्या कुटुंबाना जमा केलेली आर्थिक मदत देण्यासाठी गेले असता पाहिले. नागपूरला परत आले असता त्यांना मराठवाड्यातील परिस्थिती स्वस्थ बसू नव्हती. यातच नागपुरात औरंगाबाद विद्यापीठाचे नामांतर करा आणि मराठवाड्यातील आंबेडकरी वस्त्यावरील हल्ले थांबवा यासाठी निघालेली दोन मोर्चे चिरडली गेली. या पार्श्वभूमीवर प्रा. कवाडे यांनी 'लॉंगमार्च'ची हाक दिली आणि नागपूर परिसरातील आंबेडकर समाज चेतून उठला. 

११ नोव्हेबरच्या पहाटे सूर्य जागण्यापूर्वी कितीतरी आधी नागपुरातला आंबेडकरी समाज जागला होता. शहरातील व नागपूरच्या आजूबाजूच्या भागातील निळ्या रक्ताच्या तमाम वस्त्यामधून भीमसैनिक पूर्व संधेलाच दीक्षाभूमीवर जोशात दाखल झाले होते. भीमसैनिकांचा लाँगमार्च दीक्षाभूमीवरून सकाळी ११.४५ वाजता मार्गक्रमण झाला. रस्त्याच्याकडेला दुतर्फा उभे राहून लोक हे ऐतिहासिक दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवत होते. आश्चर्यमिश्रित तितकाच कौतुकाचा भाव त्यांच्या डोळ्यांतून ओसंडत होता. 'लोकमत' चौकात लाँगमार्चचा अग्रभाग आला तेव्हाही लाँगमार्चचे शेवटचे टोक दीक्षाभूमीवरच होते. एवढा लांब भीमसैनिकांचा हा 'मार्च' नागपूकरांसाठी अनौखा होता. मैल दर मैल करत वस्त्या - पाड्यावर विसावा घेत लाँगमार्च बुरीबोटी- केळझर- वर्धा - देवळी - गलमगाव - कळंब - यवतमाळ - बोरी अरब - कारंजा - मंगरूळपीठ - बिटोडा - वाशीम - मालेगाव - डोणगाव - मेहकर - दुसरबीडपर्यंत पोहंचला. या तब्बल ४७० किमीच्या अंतरात लॉंगमार्चमध्ये हजारोंनी भीमसैनिक सहभागी झाले होते. यातील कोणालाही चालण्याचा सराव नव्हता मात्र त्यांनी एका नव्या उर्जेने हा पल्ला पार केला. कसलीही सुविधा नसतांना अंधारात, काट्याकुपाट्या तुडवत, थंडी, पाऊस वारा अंगावर घेत भीमसैनिक पुढ जात होते. मजल दर मजल करत मिळेल ते अन्नपाणी घेत, जमिनीला अंथरून करत आणि उघड्या आकाशाचे पांघरून करत पेटलेला हा भीमसागर औरंगाबादला पोहचण्यास आतुर झाला होता.

दुसरबीडजवळ लॉंगमार्च मोडीत काढला 
राहेरी या दुसरबीड जवळील शिवारात शासनाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या मार्गावरील साखर कारखान्याजवळ येताच आज काहीतरी विपरीत घडणार याची सर्वांना कल्पना आली होती. राहेरीच्या शिवारात येताच पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अटक करायची असल्यास करा असे सांगत सारे भीमसैनिक तिथेच मुक्कामी थांबले. मात्र, पोलिसांनी पूर्वनियोजित पद्धतीने २७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री मनुष्यवस्तीपासून दूर विसावा घेतलेल्या भीमसैनिकांना ताब्यात घेण्यात सुरुवात केली. यामुळे एकच गोंधळ उडाला पोलीस अमानुषपणे मारहाण करत सर्वांना ताब्यात घेत होते. हे कळताच मारहाणीचा जाब विचारण्यास प्रा. कवाडे, मामा सरदार, इ.मो. नारनवरे पोलिसांच्या दिशेने सरसावले, त्यांना पाहताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठ्यांचा वर्षाव केला. शेवटी सर्वांना ताब्यात घेत वेगवेगळ्या २२ बसमध्ये टाकून पोलीस घेऊन गेले. यानंतर  प्रा. कवाडे यांना मेहकरच्या जेलमध्ये तर अन्य भीमसैनिकांना नागपूर, अकोला आणि अमरावतीच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. १२ डिसेंबरला सर्वांची अतोनात हाल करून सुटका करण्यात आली. मात्र, जेलमधील संपूर्ण काळात प्रा. कवाडे आणि भीमसैनिक यांची भेट नव्हती. जेलमधून अन्य भीमसैनिकांची सुटका झाली तरीही प्रा. कवाडे यांचे ठिकठिकाणच्या पोलिसांकडून कितीतरी दिवस सारखे अटकसत्र सुरू होते.

येणाऱ्या पिढ्यांना उर्जा देणारा लढा  
भीमसैनिकांना हक्क, अधिकार, जमिनी असा सार संघर्षाशिवाय मिळाले नाही. हे सारे लढे समाजास काहीतरी लाभ मिळविण्यासाठी होता. मात्र नामांतराचा हा लढा केवळ अस्मितेचा होता. या दरम्यान आमच्याकडे केवळ आमच्या शब्दांचेच हत्यार होते, नेत्यांची भाषणे, एकांकिका, नाटिका आणि क्रांतीगीते यांनी आम्ही भीमसैनिकांना प्रेरित करत असू. या लढ्याने येणाऱ्या पिढ्यांना नवी उर्जा देण्याचे,स्वाभिमानाला नवी धार दिली. काहीजण यास नामविस्तार म्हणतात पण विधिमंडळ ठरावाप्रमाणे हे नामांतरच आहे. 
- कवी इ. मो. नारनवरे, नागपूर 

लॉंगमार्चने नामांतराचा प्रश्न देश पातळीवर नेला
लोकशाही मार्गाने निघालेल्या लॉंगमार्चने नामांतराच्या प्रश्नाची देश पातळीवर दखल घेण्यास भाग पाडले. ऐतिहासिक अशा या आंदोलनात  आम्ही सर्व धर्माच्या लोकांना सहभागी करून घेत हा लढा सतत तेवत ठेवला. तसेच लॉंगमार्चच्या मार्गात आणि त्यानंतरही भीमसैनिक आणि सवर्ण असा वाद होणार नाही याची दक्षता घेतली. अनेक मोर्चे, आंदोलने, धरणे करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास देण्यात आले त्या दरम्यान मला हर्सूलच्या जेलमध्ये १५ दिवस डांबून ठेवले होते. यामुळे मी त्या दिवशी या सुवर्णक्षणाचा आनंद घेऊ शकलो नाही. 
- जे. के. नारायण, औरंगाबाद

जीवनाचे सार्थक झाले 
मिळेल ते अन्न आणि पाणी यावर निघालेल्या या लॉंगमार्चच्या अविस्मरणीय आठवणी आजही माझ्या समोर आहेत. पायी अंतर कापत आम्ही सारे थंडी, वारा पाऊस याची तमा न बाळगता पुढे जात असत. डोक्याला कफन बांधून निघालेले सारे भीमसैनिक कधी शिळ्या तर कधी बुरशी आलेल्या भाकरी खाऊन नदीचे पाणी पीत पुढे सारेजण न थकता पुढे निघत. पुढच्या टप्प्याला सर्वांची राहण्याची आणि जेवणाची काय व्यवस्था होईल याची जबाबदारी आम्ही काहीजण पुढे जाऊन बघत. या अभूतपूर्व आंदोलनात सहभागी होऊन जेव्हा डॉ. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठास मिळाले तेव्हा जीवनाचे सार्थक झाल्याची भावना मनात आली. 
- थॉमस कांबळे, नागपूर 

अभिमान आहे लॉंगमार्चमध्ये सहभागी होतो 
औरंगाबादच्या दिशेने लॉंगमार्च निघणार याची माहिती मिळाताच आम्ही गोंदियावरून शेकडो भीमसैनिकांसह आदल्या रात्रीच दीक्षाभूमीवरू आलो. औरंगाबादच्या दिशेने कूच करणे तेही दूरवर पायी चालण्याची सवय नसतांना एक एक भीमसैनिक यात जोडला जात होता. हे सारे उत्स्फूर्त होते. ठीक ठिकाणाहून लॉंगमार्चमध्ये हजारो भीमसैनिक अपार उत्साहाने आम्हाला सोबत करत, त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आमचा थकवा क्षणात जायचा. प्रत्येक मुक्काम भीमसैनिकांचा सहभाग वाढविणारा होता.
- महेंद्र नागदिवे, गोंदिया 

अपुऱ्या व्यवस्थेवर निघालो मात्र जिंकलो 
डॉ. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठास देयचे आहे, या एकाच ध्येयाने आम्ही सारे गोंदियावरून लॉंगमार्चमध्ये सहभागी होण्यासाठी दीक्षाभूमीवर आलो. येथे येणारा आमचा पहिला जत्था होता. लॉंगमार्च पूर्वी याच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी आम्ही पार पाडली होती. यानंतर लॉंगमार्चमध्ये सहभागींच्या सोयीसुविधांचे व्यवस्थापन करणे हे आम्ही उत्साहाने केले. तुटपुंज्या रसदीवर आम्ही मोठ्या निर्धाराने  कूच करत असत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये नामांतराचा लढा आम्ही उभारला. मोठ्या संघर्षानंतर जेव्हा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव मिळाले तेव्हा लढयास यश मिळाले याचे समाधान वाटले.
- सतीश बनसोड, गोंदिया 

अतुलनीय असा लॉंगमार्च 
मोठ्या भावामुळे प्रा. कवाडे यांच्या नेतृत्वात लॉंगमार्च निघणार याची माहिती मिळाली. नागपूरला माझ्या ताईला, मी नामांतर करण्यासाठी जात आहे ऐवढे सांगून घर सोडले होते. या दरम्यान, अतुलनीय अशा लॉंगमार्चच्या नोंदी मी टिपून घेत असे. आमचा चारपाच जणांचा एक गटच तयार झाला होता. एकजण चित्र काढत असे तर मी प्रत्येक सभेचे, भाषणांचे, घोषणेचे, अनुभवांचे टिपण काढत असे. माझ्या मते स्वातंत्र्यानंतर निघालेले हा लॉंगमार्च केवळ अतुलनीय आहे. 
- दिवाकर गायकवाड, नागपूूर



संदर्भ : http://m.lokmat.com/aurangabad/namantar-andolan-longmarch-lets-go-blue-ribbon-forming-army/

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मराठा तरूणाने केली होती आत्महत्या

संपत मोरे

सोमवार, 14 जानेवारी 2019

"मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सातारा जिल्ह्यातील विलास ढाणे यांनी आत्महत्या केली होती. विलास ढाणे यांच्या खिशात माझ्या नावाने लिहिलेली चिट्टी होती. त्यामध्ये त्यात 'नामांतर होईल असे मला वाटत नाही. म्हणून मी आत्महत्या करतोय.' अशा आशयाचा मजकूर होता.

पुणे : "मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सातारा जिल्ह्यातील विलास ढाणे यांनी आत्महत्या केली होती. विलास ढाणे यांच्या खिशात माझ्या नावाने लिहिलेली चिट्टी होती. त्यामध्ये त्यात 'नामांतर होईल असे मला वाटत नाही. म्हणून मी आत्महत्या करतोय.' अशा आशयाचा मजकूर होता.

नामांतर लढाईतील अनेक सत्याग्रहात तो सहभागी होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नामांतरासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्या हुताम्यांच्या नावाची  यादी लावली आहे त्यात विलास ढाणे यांचा समावेश  करावा अशी लेखी विनंती मी तत्कालीन कुलगुरू डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांना केली होती"असे डॉ बाबा आढाव यांनी सांगितले.

आढाव म्हणाले, "विलास सातारा जिल्ह्यातील जळगाव येथील शेतकरी मराठा समाजातील तरुण तो डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या समाजवादी युवक दलात काम करत होता.मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी म्हणून जी चळवळ उभा राहिली त्याचे पडसाद साताऱ्यात उमटले. तिथलेही युवक या लढाईत सहभागी झाले.विलास ढाणे हा शेतकरी कुटुंबातील मुलगा या लढ्यात आला.आईवडिलांना एकुलता एक असणारा हा पोरगा विचारांनी भारलेला.समाजवादी युवक दलाचे काम तो मनापासून करत होता. नामांतराच्या चळवळीत त्याला जे योगदान देता येईल तेवढं देत राहिला.नामांतराची चळवळ सुरू असतानाच एक दिवस मला पोलीस ठाण्यातून बोलावणं आलं.मी गेल्यावर पोलिसांनी मला सांगितलं'एका तरुणाने तुम्हाला पत्र लिहून आत्महत्या केली आहे.'तो तरुण म्हणजे विलास ढाणे होता.मराठवाडा विद्यापीठाचे नामांतराला उशीर होतोय.आजच्या परिस्थितीत नामांतर होईल असं मला वाटत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे.'या आशयाचा मजकूर त्यात होता.त्या घटनेने मी हादरून गेलो.होतो."

विलास ढाणे यांच्याबाबत त्यांचे जेष्ठ सहकारी पत्रकार विजय मांडके सांगतात, "विलास हा विचारावर ठाम असणारा आणि कृती उक्ती यात अंतर नसणारा एक सच्चा कार्यकर्ता होता.तो मराठवाडा विद्यापीठाच्या सत्याग्रहात आमच्यासोबत होता. समाजवादी युवक दलाचे वतीने सातारा ते महाडचे चवदार तळे असा लॉंगमार्च काढला होता तेव्हा विलासने खूप कष्ट घेतले होते.त्याच्या आत्मबलिदानानंतर आम्ही त्याच्या प्रतिमेचे अनावरण सातारा येथे केले तेव्हा जेष्ठ पत्रकार चंद्रकांत घोरपडे यांच्या हस्ते ते झाले.दरवर्षी नामविस्तार दिनाच्या दिवशी मला माझ्या मित्राची आठवण येते.आज त्याचे आईवडील हयात नाहीत. त्याच्या गावी त्याच  जवळचे कोणीही नाही. चुलत भाऊ आहे. त्यामुळे त्याच्या गावाकडून जर जाण्याचा योग आला तर डोळे पाण्याने भरतात.नामांतर व्हावे म्हणून जातीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या आणि या लढ्यात स्वतःचे बलिदान देणाऱ्या विलासची आठवण सर्वांनी ठेवली पाहिजे."अशा भावना मांडके यांनी व्यक्त केल्या.

Web Title:Youth committed Suicide for Marathwada university Agitation



Ref : https://www.esakal.com/pune/youth-committed-suicide-marathwada-university-agitation-165703