...आणि सिद्धार्थाने परिव्रजा घेतली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
...आणि सिद्धार्थाने परिव्रजा घेतली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

बुद्ध आणि त्याचा धम्म

   शाक्यांचा एक संघ होता. वयाच्या विसाव्या वर्षी शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागे व सभासद व्हावे लागे. सिद्धार्थाने वीस वर्षे पूर्ण झाल्यावर संघाची दीक्षा घेतली व तो सभासद झाला. संघाच्या सेनापतीने संघाच्या नियमाप्रमाणे सिद्धार्थाला संघाचा सभासद म्हणून मान्यता दिली. संघाचे कर्तव्य व नियम त्याला समजावून सांगितले. सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करीन, असे सिद्धार्थाने मान्य केले. आठ वर्षांनंतर सिद्धार्थाचा संघाशी संघर्ष सुरू झाला.
   शाक्यांच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. मधे रोहिणी नदी. त्यामुळे दोन राज्ये विभागली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय आपापल्या शेतीकरिता वापरात असत. प्रथम पाणी कोणी घ्यावे, यावरून नेहमी वाद व भांडणे असत. कधी मारामारी देखील होत असे. हा पाण्याचा वाद मिटवण्यासाठी कोलियाविरुद्ध लढणे म्हणजे शाक्य संघाच्या सेनापतीने युद्ध करण्याचे ठरवले. युद्ध केल्याशिवाय रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार नाही, म्हणून शाक्य संघाने युद्ध करण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थाला युद्ध करण्याचा निर्णय मान्य नव्हता.
   प्रत्येक संघाच्या सदस्यांनी २० ते २५ वर्ष वय असणाऱ्यांनी सैन्यात दाखल व्हावे व युद्धात सामील व्हावे, असा ठराव संमत केला. सिद्धार्थाने युद्ध करण्यास विरोध केला व सैन्यात दाखल होण्यास नकार दिला.
   सिद्धार्थाने आपले मत प्रदर्शित केले की, युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्धाने आपला हेतू सफल होणार नाही. जो दुसऱ्याची हत्या करतो, त्यालाही त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. युद्धामुळे अनेक सैनिकांची हत्या होते.' सिद्धार्थ अहिंसक मनाचा होता. "युद्ध करू नका" असे त्याने आपले मत मांडले. ते संघाच्या सेनापतीला पटले नाही. वैराने वैर वाढते असे सिद्धार्थाने पटवून देण्याचा प्रयत्न केला. सेनापतीने त्याचे तत्वज्ञान मान्य केले नाही.
   संघाने सिध्दार्थविरुद्ध कठोर निर्णय घेतले. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे, देहांत शासनाला किंवा त्यागाला संमती देणे आणि आपल्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार व त्याच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे.
   सिद्धार्थाने परिव्राजक ( संन्यासी ) होणे व देश सोडून जाणे, हा निश्चय पक्का केला व संघाला अभिवादन दिले. संघाने त्याचे म्हणणे मान्य केले. सिद्धार्थ देशत्याग करणार म्हणून त्याचे कुटुंब अतिशय दुःखी झाले.
   सिद्धार्थाने कपिलवास्तुतील भारद्वाजच्या हस्ते परीव्रजा घेण्याचे ठरवले. परिव्रजा घेताना वडील शुद्धोधन व माता प्रजापती गौतमी उपस्थित राहू नये असे त्यास वाटले. पण ते अगोदरच आश्रमात येऊन पोहचले होते. ते सिद्धार्थाने पाहिले. त्याने त्यांचा आशीर्वाद घेतला. सेवकाने कंठक घोड्याला झाडाला बांधले होते. आपली सगळी कपडे सेवकांकडे दिली व मुंडन करून घेतले. त्याचा चुलतभाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य ते कपडे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. भारद्वाजाने संस्कार विधी केला व गौतम परिव्रजक झाल्याचे जाहीर केले.
   परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. जनसमुदाय त्याच्यामागोमाग जाऊ लागला. तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले व जनसुदायास सिद्धार्थ म्हणाला, माझ्यामागे येऊन काही उपयोग नाही. मी शाक्य व कोलियांचा झगडा मिटवू शकलो नाही. तुम्ही तडजोडीचा मार्ग काढून यशस्वी व्हावे, म्हणून तुम्ही परत जावे. हे ऐकून जनसमुदाय मागे परतला. परिव्रज्या घेताना सिद्धार्थाने वय २९ वर्षांचे होते तेव्हा त्याने गृहत्याग करून संन्यास घेतला.
   कंठक घोड्याला घेऊन सेवकाने समुदायाच्या बरोबर मागे परतावयास पाहिजे होते. सेवकाने अनोमा नदीपर्यंत पोहचविण्याचा आग्रह केला. हा आग्रह सिद्धार्थ नाकारू शकला नाही. सेवकाला परत जाण्यास सांगितले, सेवक अतिशय दुःखी झाला, त्याने काशाय वस्त्र परिधान केलेल्या सिद्धार्थास नमन केले. परत मागे फिरला. कंठक घोड्यासह व गौतमशिवाय राजाच्या अंतःपुरास पोहचला. गौतमाचे परिव्रजा घेऊन पुढील प्रवासास निघून गेला.
   सिद्धार्थाने हा कठीण मार्ग स्वीकारून आपल्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कार व संपत्ती जप्तीपासून वाचविले. सैन्यात भरती न होता अहिंसेचा मार्ग स्वीकारला याच सिद्धार्थाने नव्या बुद्धधम्माचा शोध लावला. मानावाचे दुःख कसे कमी होईल, विज्ञानवादी बुद्धधम्माचा शोध लावला. मानवाच्या कल्याणासाठी ४५ वर्ष त्यांनी बुद्धधम्माचा, तत्वज्ञानाचा प्रचार केला. मानवाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला. मानवतावादी बुद्धधम्माची दीक्षा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे ५ लाख अनुयायांसह १४ ऑक्टोबर१९५६ रोजी घेतली. दलित, शोषित, पीडित समाज अंधश्रद्धेतून बाहेर पडला. धर्मांतरित बौद्ध समाजाची फार मोठी प्रगती झाली.

संदर्भ : सम्राट - वृत्तपत्र, दि. १६ ऑगस्ट २०१७, पान नं. ४, उ. भि. इंगोले, मोबाईल- ९४२२५८७४२६