India and Bharat लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
India and Bharat लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

'इंडिया' आणि 'भारत' संदर्भात चालू असलेला वाद

 

    प्रतिमा : गुगल 

'इंडिया' आणि 'भारत' संदर्भात चालू असलेला वाद 

नवी दिल्ली येथे होणाऱ्या G-20 शिखर परिषदेच्या निमंत्रणपत्रिकेमध्ये अलीकडेच लक्षणीय बदल करण्यात आला आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' या शब्दाऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' हा शब्द वापरण्यात आला आहे. यामुळे राष्ट्राचे नाव आणि त्याचे ऐतिहासिक संदर्भ यासंबंधी व्यापक चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

इंडिया आणि भारत या नावांसंदर्भातील ऐतिहासिक दृष्टिकोन :

घटनात्मकता :

भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये आधीपासूनच इंडिया आणि भारत या दोन्हींचा परस्परांऐवजी वापर केला आहे असे नमूद करण्यात आले आहे, ते पुढीलप्रमाणे : इंडिया म्हणजे भारत हा राज्यांचा संघ असेल. भारतीय राज्यघटनेची इंग्रजी प्रास्ताविका 'We the people of India' ने सुरू होते तर हिंदी प्रास्ताविकेमध्ये मात्र इंडियाऐवजी ‘भारत' हा शब्द वापरण्यात येतो.

 

भारत नावाचे मूळ :

भारत' या शब्दाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मुळे फार खोलवर रुजलेली आढळतात येतात. याचा उल्लेख पुराण वाड्:मय आणि महाभारतात सापडतो. विष्णुपुराणात भारता’ चे वर्णन ‘दक्षिणेकडील समुद्र आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित हिमालय पर्वत यांच्यामधील भूमी' असे केले आहे. हे केवळ राजकीय किंवा भौगोलिक अस्तित्वापेक्षा धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अस्तित्व दर्शवते.  भारतासंदर्भातील मूळ असणारे 'भरत' हे नाव एक पौराणिक प्राचीन राजाचे असून त्याला सर्व उपखंडातील लोकांच्या पूर्वजांचे प्रतीक मानण्यात आले आहे.

 

इंडिया नावाचे मूळ :

इंडिया हे नाव इंडस (Indus - सिंधू) या शब्दावरून आले आहे. ही भारताच्या वायव्य भागातून वाहणारी नदी आहे. प्राचीन ग्रीक लोक सिंधूच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांना इंडोई म्हणत असत. याचा अर्थ 'सिंधूचे लोक' असा होत असे. नंतर पर्शियन लोक आणि अरबांनीही सिंधूच्या भूमीचा संदर्भ देण्यासाठी हिंद किंवा हिंदुस्तान हा शब्द वापरला. युरोपियन लोकांनी या स्त्रोतांवरून इंडिया हे नाव स्वीकारले आणि ब्रिटिश राजवटीनंतर ते देशाचे अधिकृत नाव बनले.

 

इंडिया आणि भारत बाबत संविधान सभेतील चर्चा :

देशाच्या नावाभोवतीचा हा वाद नवीन नाही. १९४९ मध्ये जेव्हा संविधान सभा संविधान तयार करत होती तेव्हा सुद्धा नावाबाबतीत मतभेद निर्माण झाले होते. काही सदस्यांना असे वाटत होते की इंडिया ही वसाहतवादी दडपशाहीची आठवण आहे आणि त्यांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये 'भारत' या नावाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला.

जबलपूर येथील शेठ गोविंददास यांनी इंडियापेक्षा भारतला प्राधान्य देण्यात यावे यावर प्रकर्षाने भर दिला. हरगोविंद पंतांनी युक्तिवाद केला की लोकांना 'भारतवर्ष’ हवे आहे त्यामुळे परकीय राज्यकर्त्यांनी लादलेला 'इंडिया' हा शब्द वापरणे अयोग्य आहे.

 

अलीकडील घटना :

सर्वोच्च न्यायालयाने इंडिया हे नाव बदलून भारत करण्यासंदर्भातील याचिका दोनदा (२०१६ व २०२०) फेटाळल्या आहेत.

 

'हिंदुस्थान' या नावाचे ऐतिहासिक महत्त्व :

हिंदुस्थान या शब्दाला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि पंजाबमध्ये तो लोकप्रिय होता. शीख संस्थापक गुरू नानक देव यांनी गुरुबानीमध्ये 'हिंदुस्थान' चा उल्लेख केला आहे आणि गुरू तेग बहादूर यांना 'हिंद' आणि 'धर्माचे रक्षक' म्हणून ओळखले जाते. गदर पक्ष आणि स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यवाहींमध्ये 'हिंदुस्थान' शब्दाचा वापर केला. त्यामुळे सध्या निर्माण झालेला 'इंडिया' आणि 'भारत' या नावांसंदर्भातील वाद सामंजस्याने सोडवणे गरजेचे आहे.




 

मासिक : चाणक्य मंडळ / ऑक्टोबर / पान नं १० /११