सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

आंबेडकरांचा राष्ट्रवाद

राष्ट्रवाद हा अलीकडच्या काळात परवलीचा शब्द झाला आहे. नरहर कुरुंदकर यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'राष्ट्रवाद' या त्यांच्या ग्रंथातून बाबासाहेबांचा राष्ट्रवाद सोदाहरण मांडला आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने त्याचा आढावा - 

                    राष्ट्रवाद ही व्यक्तीची नसून समष्टीची  कल्पना आहे. पण आपल्या देशात राष्ट्रप्रेमाबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या तेव्हा त्या राष्ट्रपुरुषांच्या अनुयायांना त्यांचा राष्ट्रवाद मांडावा लागला. त्यातून टिळकांचा राष्ट्रवाद, सावरकरांचा राष्ट्रवाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद असा विचार करायची पद्धत रूढ झाली. पुढे पुढे राष्ट्रवादापेक्षा जातीवाद वाढीस लागला. एखाद्या विशिष्ट जातीत जन्मले म्हणून महामानव जातीत बंदिस्त केले जात आहेत. एकीकडे ज्यांनी सदैव संपूर्ण राष्ट्राच्या हिताचा विचार केला त्यांना अद्याप दलितांचा कैवारी संबोधले जात आहे. दुसरीकडे व्यक्तिनिष्ठेच्या पलीकडे फारसे काहीच ऋण त्यांच्या अनुयायांनी पाळलेले दिसत नाही. अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्याविषयी विचार करण्याचा फक्त आम्हालाच अधिकार आहे असे कुणी समजू लागले तर ही धारणा दलित समाजाच्या हिताला फारशी पोषक ठरण्याचा संभव नाही. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा राष्ट्रवाद समजून घेणे आवश्यक ठरते. डॉ. आंबेडकरांवरील बरेच ग्रंथ वाचले, पण नरहर कुरुंदकर यांनी मांडलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद' याला तोड नाही म्हणून हा लेख प्रपंच. 

                डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजकारणात खरा प्रवेश १९२४ साली झाला, यापूर्वी इतर दलित नेत्यांच्यासह साऊथबरो कमिशनसमोर त्यांनी एक साक्ष दिलेली होती. अस्पृश्यांच्या एका अधिवेशनाचे ते अध्यक्षही झालेले होते, पण अजून त्यांचे मन शिक्षणातच गुंतलेले होते. स्वतःच्या योजनेत ठरलेल्या उपाधींच्या काही पायऱ्या वेगाने ओलांडण्याकडे त्यांचे चित्त गुंतलेले होते. असे कोणतेही बाहेरचे अवधान त्यांना १९२४ च्या नंतर उरले नाही. या वेळेपासून आयुष्याच्या अंतापर्यंत म्हणजे १९५६ पर्यंत सुमारे ३२ वर्षे त्यांचे जीवन प्रामुख्याने सार्वजनिक प्रश्नांना वाहिलेले होते. ती एक न संपणारी झुंज होती. या सर्व राजकारणाकडे आपण एकत्रितरीत्या पाहू लागतो त्या वेळेस एका चमत्कारिक अशा अंतर्विरोधाने त्यांचे राजकारण व्यापलेले दिसते. त्यांच्या राजकारणात वरवर पाहता मोठमोठ्या विसंगती आणि बारकाईने अभ्यास केल्यास एक विलक्षण सुसंगती आढळून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात अडचणीची गोष्ट कोणती असेल तर ती ही की, ते प्रखर राष्ट्रवादी होते. सवर्ण हिंदूंचे या देशावर जसे गाढ प्रेम होते तसेच बाबासाहेबांचेही होते. ज्या देशाच्या धर्माने, संस्कृतीने आणि परंपरेने बाबासाहेबांना, त्यांच्या पूर्वजांना, त्यांच्या समाजाला शतकानुशतके गुलाम, दरिद्री आणि अस्पृश्य ठेवले त्या देशातील धर्माविषयी त्यांना राग असला तरी संस्कृतीविषयी प्रेम होते. मुळात त्यांचे विशाल आणि करुणामय मन अध:पतित समाजाच्या भ्रष्ट व्यवहाराबद्दल राष्ट्राचा सूड  घेण्यासाठी तयार नव्हते. देशावर असणारी जाज्वल्य निष्ठा हा आंबेडकरांच्या मनाचा सवर्ण हिंदूंनी न ओळखलेला, फारसा विचारात न घेतलेला असा एक धागा होता. 

                विद्यार्थी दशेतच कुठेतरी निर्भेळ राष्ट्रवादाची दीक्षा आंबेडकरांच्या मनात रुजलेली आहे. त्यांच्या पीएच.डी. आणि डी. एस्सी. च्या प्रबंधांची पार्श्वभूमीसुद्धा राष्ट्रवाद हीच आहे. इंग्रजांचे राज्य आल्यापासून शासनयंत्रणेचा खर्च कसा वाढत आहे, आणि तो भरून काढण्यासाठी कर कसे वाढवले जात आहेत, याचा तपशीलवार अभ्यास करून बाबासाहेबांनी इंग्रजांची शासनयंत्रणा हे देशाला दरिद्री करणारे, शोषणाचे बलवान साधन कसे आहे हा मुद्दा पुराव्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्यांनी प्रांतिक शासनाचा तपशीलवार आढावा घेऊन कायदेच कसे जनतेच्या हिताविरुद्ध आहेत हे सांगितले आहे. पुढे ते डी. एस्सी. होण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथल्या आपल्या प्रबंधात त्यांनी रुपयाच्या  प्रश्नाचा विचार केला आहे. भारतीय चलन आणि पौंड यांच्या विनिमयाचा दराची रचना इंग्लंडच्या हिताची आणि भारताचे शोषण करणारी कशी आहे यावर त्यांनी भर दिला आहे. या संदर्भात नरहर कुरुंदकर 'आकलन' ग्रंथात म्हणतात, आमचे सारे आद्य समाजसुधारक इंग्रजी राजवटीविषयीच्या गुणगानाने भारावलेले होते. इंग्रज राजवटीत व्यापाराच्या निमित्ताने भारताचे आर्थिक शोषण चालू आहे, या मुद्द्यावर बाबासाहेबांपूर्वी रमेशचंद्र दत्त आणि दादाभाई नौरोजी यांनी विचार केलेला होता. पण या विषयावर बारकाईने तपशीलवार अभ्यास बाबासाहेबांनीच केला. 

                आपण बाबासाहेबांचे चरित्र एकत्रितरीत्या समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ज्या घटनांमुळे बाबासाहेबांच्या राष्ट्रवादावर शंका घेतल्या गेल्या त्याच घटनांमुळे बाबासाहेब प्रखर राष्ट्रवादी होते हे सिद्ध होते. सवर्ण हिंदूना आजन्म टोचणारी पहिली घटना म्हणजे १९२७ मध्ये बाबासाहेबांनी केलेले मनुस्मृती दहन होय. प्रतीकात्मक निषेध म्हणून बाबासाहेबांनी जाहीररीत्या मनुस्मृती जाळली. आजही सवर्ण हिंदूंच्या मनात या घटनेविषयी फार मोठी रुखरुख आढळून येते. एखादे पुस्तक जाळल्याने फार मोठ्या प्रमाणात समाजात परिवर्तन होते, असे बाबासाहेबांना वाटण्याचे कारणच नव्हते. मनुस्मृती हा छापलेला ग्रंथ होता. त्यांच्या बाजारात मिळणाऱ्या सर्व प्रती प्रयत्नपूर्वक जाळून नष्ट कराव्यात, असा बाबासाहेबांचा हेतूही नव्हता. ज्ञानावर आणि पुस्तकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या ज्ञानसाधकाची ही प्रवृत्ती असणेही शक्य नव्हते. मनुस्मृती दहन हा एक प्रतीकात्मक निषेध होता. हिंदू धर्म, समाज प्रथा, परंपरा, चालीरीती, यांचा गौरव करीत आधुनिक जीवनाची निर्मिती करता येणे अशक्य आहे हे बजावून सांगण्याचा तो एक नाट्यमय प्रयत्न होता. मागोमाग हिंदू समाज विषम, विस्कळीत आणि जुनाट राहिला. त्यामुळे दुबळा आणि मागासलेला राहिला. हे दुबळेपण संपवून समानतेचे एक नवे जग निर्माण करावयाचे असेल आणि हिंदू समाज सलग आणि संघटित करावयाचा असेल तर विषमतेला आधार असणाऱ्या बाबी त्याज्य आणि तिरस्कृत मानल्याशिवाय गत्यंतर नाही. हिंदू धर्म हा जगातील एकमेव असा धर्म आहे की ज्या ठिकाणी विषमतेला धार्मिक मान्यता आहे. या धर्माचे धर्मग्रंथ विषमतेला पाठिंबा देणारे असल्यामुळे या धर्मावर प्रेम करणाऱ्या, या धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तींच्या समोर दोनच पर्याय उभे असतात. एक तर धर्मग्रंथात सांगितलेली समाजरचना आदर्श मानावी आणि विषमतेचे न्याय्य म्हणून समर्थन करावे. वरिष्ठवर्णीय सनातन्यांना हे शक्य असले तरी पाप-पुण्य आणि पुनर्जन्माच्या आधारे अस्पृश्यांनी स्वतःच्या गुलामगिरीचे उदात्तीकरण करावे, तिचे समर्थन करावे ही अपेक्षा चुकीची होती. दुसरा पर्याय मनूचा, ग्रंथ-हा धर्मग्रंथ नव्हे, म्हणून तो पूज्य नव्हे, अनुकरणीय नव्हे असेसांगण्याचा होता. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, या घटनेविषयी सुशिक्षितांची अपेक्षित प्रतिक्रिया दिसून आली नाही. 

                        दुसरी घटना गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेबांनी केलेली स्वतंत्र मतदारसंघाची मागणी होय. स्वतंत्र (विभक्त) मतदारसंघाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर नक्की मत कधीच बनवू शकले नाहीत. मुसलमानांपुढचा प्रश्न अगदी स्वच्छ होता. आम्ही वेगळे राष्ट्र आहोत, आम्हाला वेगळा मतदारसंघ हवा, बहुसंख्येच्या आक्रमणापासून संरक्षण हवे, ही मागणी सर्वांच्या समोर होती. राष्ट्रवादी मुसलमानांनाही वेगळा मतदारसंघ हवाच होता. १९१६ ला लखनौ करार करून टिळकांनी तो दिला. डॉ. आंबेडकरांना याविषयी कधीच निर्णय घेता आला नाही. १९१९ साली साउथबरो समितीसमोर त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ मागितला. १९२८ साली सायमन कमिशनसमोर दलितांना स्वतंत्र मतदारसंघ नको, हे तर त्यांनी सांगितलेच, पण मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी कुणालाच स्वतंत्र मतदारसंघ नसावा, असे प्रतिपादन केले. १९३१ साली गोलमेज परिषदेत दलितांना स्वतंत्र मतदारसंघ त्यांनी मागितला. पुढे येरवडा पुणे कराराच्या वेळी तो त्यांनी सोडून दिला. १९४० साली पाकिस्तानचा विचार करताना त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाचे काही प्रमाणात समर्थन केले. भारतीय संविधान बनवताना स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला. १९५२ सालच्या निवडणुकीच्या आरंभाला एका व्याख्यानात त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाला पाठिंबा दिला. पण सर्वसामान्यत्वे ते स्वतंत्र मतदारसंघाच्या कायमचे विरोधी राहिले. या प्रश्नावर आपले मत नक्की करणे बाबासाहेबांना नेहमीच कठीण जात होते. याचे कारण असे की, त्यामुळे सांप्रदायिक फुटीर संघटना वाढतील, फुटीरपणा वाढेल, विस्कळीतपणाच्या योगाने आर्थिक प्रगतीत आणि सामाजिक परिवर्तनात अडथळे येतील. त्यात या देशाचे आणि म्हणून सर्वांचेच नुकसान आहे, असे त्यांना वाटे. हा त्यांचा राष्ट्रवाद त्यांना स्वतंत्र मतदारसंघापासून दूर ठेवी. पण अल्पसंख्याकांना नेहमीच बहुसंख्याकांच्या आक्रमणाची भीती असते. मतदारसंघ संयुक्त राहिले तर बहुसंख्याक सवर्ण हिंदू आपला पाठिंबा देऊन कोणताही दलित उमेदवार निवडून आणतील आणि दलित समाजाच्या खऱ्या प्रतिनिधींना शासनात सहभागीच होता येणार नाही, याची त्यांना चिंता वाटे. ही चिंता अगदीच खोटी होती असे म्हणता येणार नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवले त्यांना त्या संविधानाच्या आधारे लोकसभेत निवडून येणेच अशक्य झाले. 

                            तिसरी घटना म्हणजे १९३५ मध्ये बाबासाहेबांनी केलेली घोषणा, 'मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' ही होय. चौथी घटना गांधींसह काँग्रेस फाळणीला विरोध करीत असताना, बाबासाहेबांनी फाळणी अत्यावश्यक आहे हे समजून सांगणारा 'थॉट ऑन पाकिस्तान' हा ग्रंथ १९४० ला लिहून प्रकाशित केला. पाचवी घटना १९४५ मध्ये लिहिलेला 'राज्य आणि अल्पसंख्याक' हा ग्रंथ, तो म्हणजे बाबासाहेबांच्या मनातील राज्यघटनाच होय. पण पुढे ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. त्यांनी 'राज्य आणि अल्पसंख्याक' या ग्रंथात मांडलेले विचार बाजूला ठेवून सर्व संविधान सभेला मान्य होणारे भारतीय संविधान तयार करून दिले. सहावी घटना हिंदू कोड बिल व त्यासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या हिताचा सदैव विचार करणारे राष्ट्रपुरुष होते हे सिद्ध होते. सातवी शेवटची घटना म्हणजे १९३५ मध्ये केलेली घोषणा. ती त्यांनी मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी म्हणजे १९५६ मध्ये धर्मांतर करून पूर्ण केली. पण तेव्हाही राष्ट्रहिताचाच विचार करून बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्म स्वीकारण्याची सूचना दिली ही गोष्ट मला अतिशय महत्त्वाची वाटते. 

                              अस्पृश्य आणि दलितांच्या दृष्टीने विचार केला तर सवर्ण हिंदूंचा इतिहास हा शोषकांचा, अत्याचार करणाऱ्यांचा इतिहास होता, तरीसुद्धा आंबेडकरांनी या साऱ्या इतिहासाला क्षमा केली. या देशाचा, इथल्या संस्कृतीचा, इथल्या कायद्याचा धर्म स्वीकारला. या राष्ट्राच्या हिताला अडथळा ठरेल असे काहीही करण्याचा विचार त्यांच्या मनात शेवटपर्यंत आला नाही. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हे जन्मभर अपमानित राहिलेल्या एका महान नेत्याच्या निष्कलंक राष्ट्रवादाचे आणि उज्ज्वल क्षमाबुद्धीचे महत्त्वाचे उदाहरण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या मुद्द्यावर जी भूमिका घेतली आहे ती अनेक अर्थानी विचारार्ह आहे. सावरकर म्हणत, ‘बौद्ध, अस्पृश्य हे हिंदूच होत.' सावरकरांनी ज्या अर्थाने हिंदू शब्द वापरला आहे, त्या अर्थाने बौद्ध हिंदूच आहेत. सावरकरांच्या अर्थाने बौद्ध नेहमीच हिंदू राहिले पाहिजेत, हा आंबेडकरांचा प्रयत्न होता. हे संपूर्ण राष्ट्र एक राष्ट्र आहे, ही आमची पितृभूमी, पुण्यभूमी आहे, असे ज्यांना वाटते ते हिंदूच होत, असे सावरकरांचे मत आहे. या दृष्टीने पाहिले तर बौद्ध हिंदूच आहेत, मात्र वेद प्रमाण मानणारे नाहीत. 

                        बौद्ध धर्माविषयी बाबासाहेबांना सर्वात मोठे आकर्षण कोणते असेल तर हे की, या धर्माला ईश्वर मान्य नव्हता. या धर्माचा प्रवर्तक ईश्वराचा अवतार नव्हता, पुत्रही नव्हता, संदेशवाहक दूतही नव्हता. कोणत्याही पारलौकिक शक्तीचे स्तोम न माजविणारा असा हा 'धम्म' होता. आंबेडकरांनी मुद्दाम धर्मापेक्षा ‘धम्म' निराळा सांगितला आहे. त्यांच्या मते धर्म हा पारलौकिक आधारावर आधारलेला असतो. 'धम्म' माणसाच्या विवेकबुद्धीने दाखवलेला रस्ता असतो. जगातले अनेक धर्म त्यांच्यासमोर होते. पण जगाच्या इतिहासाचा बारकाईने अभ्यास करून व्यक्ती धर्मश्रद्धेशिवाय राहू शकत असली तरी समाज धर्मश्रद्धेशिवाय राहात नाही. आर्थिकदृष्ट्या मागास असे जे समाज आहेत त्यांना तर धर्माची नितांत गरज असते. हा प्रश्न केवळ पारलौकिक मुक्तीचा नसतो, इहलौकिक समाधानाचाही त्यात मोठा भाग असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना राष्ट्रहिताला अडथळा न ठरणारा बौद्ध धर्म स्वीकारण्याची सूचना १४ नोव्हेंबर १९५६ रोजी दिली, आणि ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. अशा या देशावर अपार प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादी महामानवाला कोटी कोटी प्रणाम.


लोकप्रभा, १७ ऑगस्ट २०१८ 

 

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

'इंडिया' आणि 'भारत' संदर्भात चालू असलेला वाद

 

    प्रतिमा : गुगल 

'इंडिया' आणि 'भारत' संदर्भात चालू असलेला वाद 

नवी दिल्ली येथे होणाऱ्या G-20 शिखर परिषदेच्या निमंत्रणपत्रिकेमध्ये अलीकडेच लक्षणीय बदल करण्यात आला आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' या शब्दाऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' हा शब्द वापरण्यात आला आहे. यामुळे राष्ट्राचे नाव आणि त्याचे ऐतिहासिक संदर्भ यासंबंधी व्यापक चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

इंडिया आणि भारत या नावांसंदर्भातील ऐतिहासिक दृष्टिकोन :

घटनात्मकता :

भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये आधीपासूनच इंडिया आणि भारत या दोन्हींचा परस्परांऐवजी वापर केला आहे असे नमूद करण्यात आले आहे, ते पुढीलप्रमाणे : इंडिया म्हणजे भारत हा राज्यांचा संघ असेल. भारतीय राज्यघटनेची इंग्रजी प्रास्ताविका 'We the people of India' ने सुरू होते तर हिंदी प्रास्ताविकेमध्ये मात्र इंडियाऐवजी ‘भारत' हा शब्द वापरण्यात येतो.

 

भारत नावाचे मूळ :

भारत' या शब्दाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मुळे फार खोलवर रुजलेली आढळतात येतात. याचा उल्लेख पुराण वाड्:मय आणि महाभारतात सापडतो. विष्णुपुराणात भारता’ चे वर्णन ‘दक्षिणेकडील समुद्र आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित हिमालय पर्वत यांच्यामधील भूमी' असे केले आहे. हे केवळ राजकीय किंवा भौगोलिक अस्तित्वापेक्षा धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अस्तित्व दर्शवते.  भारतासंदर्भातील मूळ असणारे 'भरत' हे नाव एक पौराणिक प्राचीन राजाचे असून त्याला सर्व उपखंडातील लोकांच्या पूर्वजांचे प्रतीक मानण्यात आले आहे.

 

इंडिया नावाचे मूळ :

इंडिया हे नाव इंडस (Indus - सिंधू) या शब्दावरून आले आहे. ही भारताच्या वायव्य भागातून वाहणारी नदी आहे. प्राचीन ग्रीक लोक सिंधूच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांना इंडोई म्हणत असत. याचा अर्थ 'सिंधूचे लोक' असा होत असे. नंतर पर्शियन लोक आणि अरबांनीही सिंधूच्या भूमीचा संदर्भ देण्यासाठी हिंद किंवा हिंदुस्तान हा शब्द वापरला. युरोपियन लोकांनी या स्त्रोतांवरून इंडिया हे नाव स्वीकारले आणि ब्रिटिश राजवटीनंतर ते देशाचे अधिकृत नाव बनले.

 

इंडिया आणि भारत बाबत संविधान सभेतील चर्चा :

देशाच्या नावाभोवतीचा हा वाद नवीन नाही. १९४९ मध्ये जेव्हा संविधान सभा संविधान तयार करत होती तेव्हा सुद्धा नावाबाबतीत मतभेद निर्माण झाले होते. काही सदस्यांना असे वाटत होते की इंडिया ही वसाहतवादी दडपशाहीची आठवण आहे आणि त्यांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये 'भारत' या नावाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला.

जबलपूर येथील शेठ गोविंददास यांनी इंडियापेक्षा भारतला प्राधान्य देण्यात यावे यावर प्रकर्षाने भर दिला. हरगोविंद पंतांनी युक्तिवाद केला की लोकांना 'भारतवर्ष’ हवे आहे त्यामुळे परकीय राज्यकर्त्यांनी लादलेला 'इंडिया' हा शब्द वापरणे अयोग्य आहे.

 

अलीकडील घटना :

सर्वोच्च न्यायालयाने इंडिया हे नाव बदलून भारत करण्यासंदर्भातील याचिका दोनदा (२०१६ व २०२०) फेटाळल्या आहेत.

 

'हिंदुस्थान' या नावाचे ऐतिहासिक महत्त्व :

हिंदुस्थान या शब्दाला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि पंजाबमध्ये तो लोकप्रिय होता. शीख संस्थापक गुरू नानक देव यांनी गुरुबानीमध्ये 'हिंदुस्थान' चा उल्लेख केला आहे आणि गुरू तेग बहादूर यांना 'हिंद' आणि 'धर्माचे रक्षक' म्हणून ओळखले जाते. गदर पक्ष आणि स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यवाहींमध्ये 'हिंदुस्थान' शब्दाचा वापर केला. त्यामुळे सध्या निर्माण झालेला 'इंडिया' आणि 'भारत' या नावांसंदर्भातील वाद सामंजस्याने सोडवणे गरजेचे आहे.




 

मासिक : चाणक्य मंडळ / ऑक्टोबर / पान नं १० /११ 


सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

भारतीय राज्यघटना : एक सामाजिक क्रांती

                                  

                


आज २६ नोव्हेंबर, २०२३. डिसेंबर, १९४६ रोजी घटना समितीची पहिली आणि २५ नोव्हेंबर, १९४९ रोजी शेवटची मीटिंग झाली. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी देशाने अधिकृतपणे राज्यघटनेचा स्वीकार केला. म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस अलीकडे 'संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने राज्यघटनेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

 

. डॉ. आंबेडकरांना राजकीय लोकशाहीबरोबर सामाजिक आर्थिक लोकशाही अभिप्रेत होती. ते त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही, कारण अलीकडे देशातील आर्थिक विषमता वेगाने वाढत आहे. एक टक्का लोकांकडे ५४ टक्के उत्पन्न ७० टक्के संपत्ती आहे.

२. दलित स्त्रिया यांच्यावरील अत्याचार वाढत आहेत. महागाई बेरोजगारी वाढत आहे. गेल्या १५ वर्षांत देशातील साडेतीन लाख शेतकयांनी आत्महत्या केल्या.

३. आजच्या संविधान दिनापासून जात. धर्म, भाषा, प्रति, पक्ष या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपण सगळे भारतीय समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्याची जपणूक करून भारताचे ऐक्य अखंडता कायम ठेवू, अशी प्रतिज्ञा करूया. तेच भारतीय राज्यघटनेला अभिवादन ठरेल.

 

            भारताची राज्यघटना ही जगातील एक आदर्श घटना' मानली जाते. ती आदर्श आहेच; परंतु तिचे एवढेच वर्णन पुरेसे नाही. भारताचा गेल्या दोन-अडीच हजार वर्षांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक इतिहास ध्यानात घेतला राज्यघटनेची उद्दिष्ट्य ती साध्य करण्याचे सांगितलेले मार्ग पाहिले, तर भारतीय राज्यघटना ही एक 'सामाजिक क्रांती म्हणावी लागेल

    राज्यघटनेचा 'सरनामा' ही तिचा आधारभूत पाया आहे. त्यामध्ये भारत ही एक सार्वभौम, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून सर्व भारतीयांना समता, स्वातंत्र्य, बंधुता न्याय देण्याचे अभिवचन देण्यात आले आहे. त्यासंदर्भात नागरिकांमध्ये धर्म, जात, लिंग, रंग, भाषा इत्यादीवावत कोणताही भेदभाव करता येणार नाही. लोकशाहीचा प्राण असलेली संधीची समानता' हा घटनेचा गाभा आहे. त्याशिवाय नागरिकांना घटनेने प्रदान केलेले मूलभूत अधिकार त्यांना उपभोगता येणार नाहीत. शेकडो वर्षे हिंदू समाजावर कलंक असलेली अस्पृश्यता कायद्याने रद्द करण्यात आली आहे. शोषणाच्या बळी ठरलेल्या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले आहेत. अनुसूचित जाती जमातींच्या प्रगतीसाठी कायदे मंडळ, शिक्षण शासकीय सेवांत "राखीव जागा' निर्माण करण्यात आल्या आहेत

        राज्यघटनेने 'धर्मनिरपेक्ष' या आधुनिक मूल्याचा स्वीकार केला आहे. धार्मिक भाषिक अल्पसंख्याकांना त्यांचे धार्मिक भाषिक स्वातंत्र्य जोपासण्याचे अधिकार दिले आहेत. कोणत्याही एका धर्माच्या या संस्कृतीच्या गटाला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही

        राज्यघटनेने न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. राज्यघटनेचा अन्वयार्थ लावण्याचे अंतिम अधिकार न्यायपालिकेला आहेत. कायदेमंडळ, एक्झिक्युटिव्ह न्यायपालिका यांचे कार्यक्षेत्र घटनेत निश्चित करण्यात आले आहे. कुणी दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू शकत नाही. यालाच "अधिकारांचे विलगीकरण' असे म्हटले जाते. राज्यघटनेने केंद्र राज्ये यांचे आर्थिक प्रशासकीय अधिकार निश्चित केलेले आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेले राज्यपाल राज्यांच्या प्रशासनाचे घटनात्मक प्रमुख असले तरी त्यांनी राज्यांचा कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी मंत्रिमंडळाला पूर्ण सहकार्य केले पाहिजे, राज्यांची अडवणूक करता नये, असे राज्यघटनेला नुसते अभिप्रेतच नव्हे, तर तसे त्यांच्यावर बंधन आहे. पारदर्शक  निष्पक्षपातीपणे मुक्त वातावरणात निवडणूक होणे, ही लोकशाहीची अंगभूत गरज आहे. ते कार्य निर्भयपणे पार पाडण्यासाठी राज्यघटनेत "स्वतंत्र निवडणूक आयोग' स्थापन करण्यात आला आहे. राज्यघटना तयार करण्याच्या कार्यात अतिमहत्त्वाची भूमिका बजावणान्या त्यासाठी ज्यांना राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की, घटना कितीही चांगली असली, तरी तिचे यशापयश तिची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यकर्त्यांवर अवलंबून असते.


पुणे, पान नं १०, २६ नोव्हेंबर २०२३