दि. १५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा स्वातंत्रदिन ! या दिवशी ब्रिटिशांचा युनियन जॅक हा ध्वज खाली उतरवला गेला व लाल किल्ल्यावर दिल्लीत भारताचा अशोक चक्रांकीत तिरंगा हा राष्ट्रध्वज डौलाने फडकू लागला.
त्याआधी दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या घटना समितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला होता. लॉर्ड माउंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली होती. स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या घटना समिती समोर भाषण केले होते, तेव्हा ते म्हणाले होते, कितीतरी वर्षांपूर्वी आम्ही आमचे भवितव्य बदलण्याचे आमच्या मनात पक्के केले होते आणि आता आमचे ते स्वप्न खरे करून दाखवण्याची वेळ आली आहे. या मध्यरात्रीच्या घडीला जेव्हा सर्व जग झोपी जात आहे , तेव्हा भारत मात्र आपल्या जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जागा होत आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री होते. त्यांचे ते भाषण एक ड्रीम स्पीच म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. सुमारे दीडशे वर्षे ती सत्ता टिकली होती. १९३० ते १९३३ या काळात नेहरूंना तुरुंगवास भोगावा लागला होता. या काळात त्यांनी त्यांच्या कन्येस ( इंदिराजी यांस ) जवळ जवळ दोनशे पत्रे लिहली होती. त्या पत्रातून त्यांनी जगातील अनेक राष्ट्रांच्या इतिहासातील घडामोडी सोप्प्या भाषेत विशद केल्या होत्या. ग्रीक, रोमन, चिनी साम्राज्य कसे उदयास आले व कसे विलय पावले याची माहिती त्यामध्ये लिहिली होती. जगातील हुकूमशाही व लोकशाहीबद्दलही त्यामध्ये लिहली होती. जगातील वेगवेगळ्या संस्कृतीची मीमांसा त्यात केली होती. या सर्व पत्रांच्या संकलनातून जे पुस्तक तयार झाले ते "Glimpses of World History" या नावाने प्रसिद्ध आहे.
जागतिक इतिहासाची व संस्कृतीची जाण असलेले आपले प्रधानमंत्री जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या क्षणाला त्यांचे स्वप्न भाषण करतात तेव्हा ते भारताच्या करोडो लोकांचे मनोगतच व्यक्त करतात. ब्रिटिश सत्तेच्या पारतंत्र्यातून मुक्त झालेल्या स्वतंत्र भारताचे नवे भवितव्य घडविण्याचे स्वप्न त्यांच्या शब्दातून व्यक्त झाले आहे. हे भवितव्य आत्मविश्वास व स्वावलंबनवर आहे तेव्हा स्वतंत्रपणे जगण्यासाठी जी जागरूकता हवी आहे तिची जाणीवही त्या शब्दातून व्यक्त होत आहे.
अमेरिकेत जेव्हा सिव्हिल वॉर झाले त्या दरम्यानच्या काळात दि. १९ नोव्हेंबर १८६३ रोजी प्रेसिडेंट अब्राहम लिंकन त्यांच्या भाषणात म्हणाले होते, 'आपल्या पूर्वजांनी या खंडप्राय प्रदेशावर स्वतंत्र असे एक राष्ट्र निर्माण केले जे सर्व मानव एकसमान आहेत, या तत्वाला वाहिलेले आहेत. या नागरी युद्धात अशा आपल्या राष्ट्राची परीक्षा आहे की, ते टिकेल की नाही. आपल्या जीवनात आपल्यासमोर आता हे मोठे काम आहे की, या राष्ट्रात पुन्हा नवे स्वातंत्र जन्मास यावे आणि लोकांचे, लोकांनी व लोकांसाठी बनविले असलेले सरकार पृथ्वीवरुन नष्ट होऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांपासून प्रेरणा घेऊन अधिक शक्तीनिशी मनापासून असे ठरवूया की, आपल्या पूर्वजांचे प्रयत्न व्यर्थ जाऊ देणार नाही.
यानंतर सुमारे १०० वर्षांनंतर दि. २८ ऑगस्ट १९६३ रोजी वॉशिंग्टन येथे नागरी हक्कांच्या मागणीसाठी जमलेल्या दोन लाखांवरील समुदायासमोर मार्टिन ल्युथर किंग यांनी त्यांच्या भाषणात अब्राहम लिंकन यांच्यावरील भाषणाचा संदर्भ दिला तेव्हा ते म्हणाले, "माझे असे स्वप्न आहे की, हे राष्ट्र एक दिवस खऱ्या अर्थाने येथील लोकांचे राष्ट्र बनेल".
'सर्व मानव एक समान असतात' हे तत्व आम्ही आत्मसात केले आहे. माझे असे स्वप्न आहे की , जॉर्जियाच्या लाल टेकडीवर एक ना एक दिवस पूर्वीच्या गुलामांच्या मालकांची मुले भाऊ भाऊ म्हणून एकत्र बसू शकतील. माझे असे स्वप्न आहे की , माझी जी चार मुले आहेत ती एक ना एक दिवस अशा राष्ट्रात राहत असतील की, जेथे ती त्यांच्या त्वचेच्या रंगावरून नव्हे, तर त्यांच्या कर्तृत्वावरून ओळखली जातील'.
नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेत स्वातंत्र्याचा लढा दिला. त्यांनी २७ वर्षे तुरुंगवास भोगला. शेवटी तेथे लोकशाही आली व ते पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष झाले. 'भारतरत्न' तसेच शांततेचे 'नोबेल' पुरस्कारांनी ते सन्मानित झाले. मंडेला म्हणतात , आपल्यावरील बंधने काढून टाकली म्हणजे आपण स्वतंत्र झालो असे होत नाही. आपले जीवन जगत असताना जेव्हा आपण इतरांचा आदर करू, त्यांना मान देऊ, आणि त्यांचे स्वातंत्र्य अधिक वृद्धीगंत करू तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो असे होईल'.
युरोपातील देशांमध्ये फ्रेंच राज्यक्रांतीनंतर लोकशाही स्थापण झाली. 'सर्व मानव जन्मतः स्वतंत्र असून, स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मुलभूत हक्क आहे' हे तत्व तेथे मान्य करण्यात आले. अमेरिकेतील क्रांतीमुळे 'सर्व मानव एकसमान आहेत', हे तत्व मान्य करण्यात आले. तेथील गोऱ्या लोकांनी निग्रो ( काळ्या लोकांसाठी ) च्यांसाठी स्वकीयांविरुद्ध लढा दिला. तेथे अध्याक्षीय लोकशाही स्थिरावली, सर्वांसाठी समानता मान्य केल्यामुळे त्यांचे राष्ट्र एकसंघ झाले. तेथे आर्थिक संकटाच्या काळात बराक ओबामा हे प्रेसिडेंट होते. त्यांनी 'आपण या संकटातून बाहेर येऊ व पुढे चांगले दिवस येतील'. असा आशावाद दिला. ते राष्ट्र पुन्हा सावरले आहे. दि. २७ जुलै २००४ रोजीचे ओबामांचे भाषण 'ऑडेसिटी ऑफ होप' या पुस्तकात रूपांतरीत झाले.
भारतात स्वातंत्र्यानंतर भारताची राज्यघटना अंमलात आली. घटनेत भारताच्या सर्व नागरिकांनी सार्वभौम लोकशाही गणराज्यात सर्वाना न्याय, स्वातंत्र्य व समानता प्राप्त करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच सर्व नागरिकांमध्ये बंधुता वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 'राष्ट्राच्या एकता व एकात्मतेसाठी बंधुता' हे तत्व मान्य करण्यात आले आहे.
भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 'बंधुता म्हणजे काय ? माणसा माणसातील बंधुभाव म्हणजे बंधुता. बंधुता हे लोकशाहीचे दुसरे नाव आहे व नैतिकता हे बंधुतेचे दुसरे नाव आहे. स्वातंत्र्य हे काही थोड्या लोकांसाठीच असेल व इतर सर्वांसाठी नसेल तसेच समानता काही थोड्या लोकांसाठी असेल व बहुसंख्य लोकांसाठी नसेल तर भेदभाव व अन्याय यास ते कारणीभूत ठरेल. असे होऊ नये यासाठी मार्ग कोणता आहे ? उपाय एकच आहे तो म्हणजे बंधुता सर्वांमध्ये वाढविणे'.
सर्व नागरिकांनी जात, धर्म, रंग, संस्कृती, प्रांत व भाषा यापेक्षा राष्ट्र मोठे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण आपली संस्कृती मिश्र आहे पण देश एक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मी प्रथमतः भारतीय आहे व शेवटीही भारतीय आहे.'
देशात कोठेही व कुणावरही अन्याय होत असेल तर सर्व नागरिकांनी आपले सगळे भेद बाजूला ठेवून संवेदनशीलता दाखवली पाहिजे. आपल्या हक्कांसाठी सारकाकडे मागणी करताना सनदशीर मार्गनेच ती केली पाहिजे. आपल्या जगण्यासाठी आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी जागे राहण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपल्या देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलेले स्वप्न पूर्णांशाने खरे करून दाखविण्याची जबाबदारी आपलीच आहे !
संदर्भ : वृत्तपत्र - सम्राट, सोमवार १४ ऑगस्ट २०१७, पान नं. ४, एम. एम. घाडगे, मोबा - ९६१९९५३७७७.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा