शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा

   मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा आंबेडकरवादी चळवळीच्या धगधगत्या इतिहासातील एक क्रांतिपर्व होय. अस्मिता आणि अस्तित्वाच्या या लढाईत अनेकजण शहिद झाले. घरांची राखरांगोळी करण्यात आली. महिलांवर अत्याचार केल्या गेले. आज हा भूतकाळ आठवला. कारण काल शहिद चंदर पोचिराम कांबळे यांचा स्मृतिदिन होता. हे रात्री साडे अकराच्या दरम्यान एका पोस्टवरून समजले. वेळ झाला होता. अपराधीपणाची भावना मनात ठेऊनच झोपी गेलो...!
चंदर कांबळेंचे नाव आंबेडकरवादी चळवळीच्या इतिहासात केव्हाच रक्ताने नोंदविलं गेलं आहे. नामांतर आंदोलनातील पहिले शहिद पोचिराम कांबळे या सिंहाचा हा छावा ! धनदांडगे, जातदांडगे पोचिराम कांबळे यांचा एक एक अवयव तोडत मिश्किलपणे विचारत होते- बोल !  जय भीम बोलशील का ? आणि पोचिराम कंठात प्राण आणून जय भीम म्हणत होते...! शेवटी नराधमांनी तलवारीने गळा कापला...शेवटचा शब्दही होता- जय भीम ! अशा सच्चा , लढवय्या भीमसैनिकाचा चंदर चिरंजीव ! पुढे त्यांनीही आपल्या बापाचा बदला खून के बदले खून असाच घेतला. पण शेवट तोच झाला, जो हमेशा होतो. जातदांडग्यांनी चंदरचाही काटा काढला. चंदरही एकार्थाने नामांतर लढ्यातील शहिद ठरला !
स्मृतिदिनी चंदर कांबळे यांना अभिवादन करत असताना नामांतर लढ्यातील शहिद भीमसैनिक पोचिराम कांबळे, अविनाश डोंगरे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर, ज्ञानेश्‍वर साखरे, डोमाजी कुत्तरमारे, जनार्दन मवाडे, शब्बीर अली, काजल हुसैन, गौतम वाघमारे, रतन मेंढे, सुहासिनी बनसोड, नारायण गायकवाड, अब्दुल सत्तार, दिवाकर थोरात, जनार्दन मस्के, भालचंद्र बोरकर, शीला वाघमारे, प्रतिभा तायडे, गोविंद भुरेवार, शरद पाटोळे, मनोज वाघमारे, कैलास पंडित, रतन परदेसी यांचीही याद आली !
नामांतर लढ्यातील या वीरांचे हे हौतात्म्य आंबेडकरवाद्यांनी आपल्या काळजावर गोंदऊन ठेवले आहे. 17 वर्षीय लढ्यातून नेमकं काय कमावलं काय गमावलं, हा चर्चेचा स्वतंत्र विषय होय. पण हे पर्व कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा नि उर्जा देत राहील एवढे मात्र नक्की !
नागपूर येथील नामांतर शहिद स्मारक असेच एक जाज्ज्वल्य प्रेरणास्त्रोत होय...!!

#भीमप्रकाश_गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा