बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा

   'जात नाही ती जात' हे आपल्या संभाषणातल सोपं आणि निरर्थक परंतु आवडत वाक्य. 'जात जाते हो' अस आपण जोपर्यंत मानसिकता बनवत नाही तोपर्यंत समाजसुधारणेच्या हमरस्त्यावर हा राक्षस आपल्याला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. जातवीरहित समाज साकारायचा असल्यास सगळ्यांनाच वेगळा दृष्टीकोन ठेवून कार्य करावं लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीने यावर्षी बाबासाहेबाना ज्या व्यक्तींनी आपले सर्वस्व पणाला लावून मदत केली त्यांचा मरणोत्तर कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. त्यात या सहकाऱ्यांच्या आजच्या वारसदारांना गौरवण्यात आले.
   केवळ बाबासाहेबांना साथ दिली म्हणून बऱ्याच जणांना जातीतून बहिष्कृत होण्याची वेळ आली. काहींचा प्रचंड अपमान करण्यात आला. काहींना आपली नोकरी गमवावी लागली. काहींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. काहींच्या मुला मुलींची लग्न मोडण्यात आली अशा एक ना अनेक अडचणींवर मात करूनही मंडळी बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. बाबासाहेबांनी हाती घेतलेली चळवळ ही या देशाच्या चांगल्या भवितव्याची नांदी आहे व हे तर त्यांना पटलेले होते, परंतु बाबासाहेबांचं चरित्र आणि विद्वत्ता यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता . म्हणूनच सर्वस्वाचा त्याग करून नि:स्वार्थीपणे ते बाबासाहेबाना मदत करत राहिले.
   बाबासाहेब गेल्यावर यातल्या बऱ्याच लोकांकडे बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजाचे दुर्लक्ष झाले . त्यांच्याही समाजाने त्यांना वाळीत टाकले. अशा दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीत त्यांच्या वरसदारांकडेही दुर्लक्ष झालं. असा ६०/७० वर्षांचा काळ लोटला व बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने जमवलेला हा माणुसकीचा ठेवा दुरावला. या सर्वांमध्ये सुसंवाद साधावा. त्यांच्या आजच्या पिढीचा ठावठिकाणा शोधून त्यांचा मानसन्मान करावा व कृतन्यतापूर्ण त्यांच्या वाडवडिलांनी केलेल्या समाजपयोगी ऋणातून थोडं उतराई व्हावं या हेतूने राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीने ना.म. जोशी यांची नात जयमाला जोशी, आचार्य दोंदे यांचा नातू अजित, देवराव नाईक यांनी कन्या मंदाताई, सुरबानाना टिपणीस यांचा नातू मिलिंद, शांताराम रेगे यांचा नातू उमेश, कमलकांत चित्रेची मुलगी शकुंतला, नाना पाटलांचे पणतू गौतम, सीताराम जोशींची-सुरेखा/ मुरेश (नात), अनंत कानेकरांचा नातू अमिताभ व आई अनुराधा, दगडूशेठ भिलारेंचा मुलगा अशोक,  अँड. चंद्रकांत आधीका-याचा मुलगा श्रीप्रकाश, नाना साठ्यांचा मुलगा- सुराज, चिमनलाल सेटलवाडांची पणती तिस्ता, महादेव शेठ थरवालांचे नातू सिद्धेश, गुरुवर्य कृष्णाजी केळुस्कारांचे नातू अँड. हेमंत, सीताराम बोलेंचे नातू सत्यजित गायकवाड,, हैदराबादचे निझाम त्यांचे नातू प्रिन्स मोहसीन अली खान, धनंजय किर यांचे पुत्र डॉ. सुमित इ. वारासदारांशी संपर्क साधला व त्यांना या कृतन्यता सन्मान सोहळ्याला आमंत्रित केले. प्रमुख मार्गदर्शन डॉ. हर्षदीप कांबळे आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी केलं.
   यातील जवळजवळ सर्वचजण केवळ फोनवर आमंत्रण स्वीकारून सहकुटुंब कार्यक्रमाला हजर राहिले. पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे सर्वानीच बाबासाहेबांच्या आठवणी आपल्या हृदयात सुखद स्वरूपात साठवून ठेवल्यात. मंदाताईंनी सांगितलेली आठवण तर फारच सुंदर होती. त्या म्हणाल्या की, बाबासाहेब माझ्या वडिलांना घ्यायला घरी येत तेव्हा मी लहान होते, बाबा आता बाहेर जाणार म्हणून मी रडायला लागे. अशा वेळी बाबासाहेब मला उचलून घेत व मला चॉकलेट देऊन आपल्या खांद्यावर घेऊन हलक्या हाताने थोपटत शांत करत. मला झालेला तो महामानवाचा परिसस्पर्श होता. देवराम नाईकांनी जनता पत्राला वेळ देता यावा म्हणून स्वतःचे वृत्तपत्र बंद केले. शिवाय बाबासाहेबांचे सहकारी रात्री अपरात्री घरी जेवायला येत तेव्हा देवराव नाईकाच्या पत्नी इंदिराताई त्यांना स्वतःसाठी बनविलेले अन्न देऊन स्वतः उपाशी झोपत. मिलिंद टिपणीस यांचीही आठवण वेगळी होती. बाबासाहेब मिश्किल स्वभावाचे होते. तसेच त्यांना चांगले पदार्थ खाण्याची आवड होती. सुरबनानांनी मिलिंदजीला सांगितले की बाबासाहेबांच्या गौरवर्णीय कांतीवर विद्वतेची तेज असल्याने समोरची व्यक्ती त्यांच्या तेजाने भारावून जाते. बाबासाहेबांनी सांगितलेली सामाजिक लोकशाही जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत हा मानव मुक्तीचा लढा अविरत चालू ठेवावा लागेल. उमेश रेगे यांनी त्यांचे वडील शां. शं. रेगे यांच्या व बाबासाहेबांच्या पुस्तकप्रेमाबद्दल सांगितले व बाबासाहेबांच्या प्रतिभेपुढे प्रभावित होऊन त्यांच्या वडिलांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून बाबासाहेबाना साथ दिली ही आठवण सांगितली. शकुंतला गुप्ते यांनी बाबासाहेब व कमलकांत चित्रे यांच्यातील खासगी संस्थांचा जिव्हाळा उलगडून सांगितला. इतक्या वर्षानंतर आपल्या वाडीलांमुळे आम्हाला शोधून काढून हा सन्मान दिल्याने त्या भावणावश झाल्या. सुरेखा जोशी यांनी एक सुंदर कविता बाबासाहेबांवर रचली. अशोक भिलारे यांनी बाबासाहेब कोकणात आल्यावर आपले वडील त्यांची बडदास्त किती चांगली ठेवत हे सांगितले. श्रीप्रकाश अधिकारी यांचे वडील अँड. चंद्रकांत अधिकारी दलितांचे वकील म्हणून प्रसिद्ध होते. तसेच बाबासाहेबांचे ऐतिहासिक धोरण राबवले तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही हे त्यांनी सांगितले. सुरज साठे यांनी त्यांच्या काकांच्या, वडिलांच्या व्हयोलिन शिकवणीबद्दल बाबासाहेबांच्या आठवणी सांगितल्या . तिस्ता सेटलवाड यांनी चिमणलाल सेटलवाड व बहिष्कृत हितकारणी सभा यांचे नातं सांगून बाबासाहेबांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील स्थान अधोरेखित केले. इतिहासतज्ज्ञ, घटनाकार, समाजसेवक, अर्थतज्ज्ञ, राजकारणी म्हणून बाबासाहेबांचे महत्व त्यांनी सांगितले .
   केळुस्कर गुरुजींचे नातू अँड. हेमंत यांनी बाबासाहेबानी हा देश कसा एकत्र ठेवला व ते ते कायदेपंडित म्हणून काळाच्या कसे पुढे ते सांगितले. धनंजय किर व चैत्यभूमीची जागा मनपाला दान देणारे भागोजी किर यांच्या हृदय आठवणी त्यांनी सांगितल्या. यानंतर संपूर्ण संविधान तोंडपाठ असलेल्या संविधान कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनश्री आमेबतकर हिने इंग्लिशमधून संविधान तोंडपाठ म्हणून दाखवले. आपल्या समारोपाच्या भाषणात डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सर्व वारासदारांचे कृतन्यपूर्वक आभार मानले. बाबासाहेबांना अनमोल मदत करणाऱ्या वारसदारांचा सन्मान होणं ही काळाची गरज आहे हे सांगताना त्यांनी चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह हा दांडीच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या कितीतरी अगोदरचा मानवी स्वातंत्र्यासाठी झालेला सत्याग्रह आहे याची आठवण करून दिली. माणसाने माणसाला सन्मानाने वागवावे. एवढ्याशा गोष्टीसाठी बाबासाहेबाना आयुष्यभर संघर्ष करावा लागला ही दुःखद घटना असल्याचे सांगताना १०० वर्षांपूर्वी इतक्या उच्च शिक्षणाने विभूषित असतानाही केवळ भारत प्रेमापोटी बाबासाहेब भारतात परत आले व इतका अपमान, अन्याय, कुचेष्टा सहन करूनही त्यांनी बुद्धाची करूणा मनात साठवत अखंड मानवजातीवर प्रेमाचा वर्षाव केला.
   या कार्यक्रमासाठी अरविंद जगताप, दिनकर गांगल, धनंजय कर्णिक या विचारवंतांची विशेष उपस्थिती होती.

संदर्भ : लोकप्रभा, ७ जुलै २०१७, पान नं. २६,२७.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा